शिर्डी, प्रतिनिधी : श्री साईबाबा संस्थानने लेंडीबाग परिसरात श्रीराम व श्रीकृष्ण मंदिर उभारण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध दर्शवत भव्य-दिव्य मंदिर संस्थानच्या आरक्षित जागेवर उभारण्याची मागणी केली आहे. लेंडीबाग हे साईबाबांच्या स्मृतींशी निगडित पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण असल्याने त्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवावे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, श्रीराम व श्रीकृष्ण मंदिराला त्यांचा विरोध नसून ते मंदिर अधिक भव्य, प्रशस्त आणि सर्व साईभक्तांना सहज उपलब्ध होईल अशा संस्थानच्या आरक्षित जागेवर उभारले जावे. लेंडीबाग परिसरात जागेची मर्यादा असल्याने भविष्यात दर्शनासाठीही अनेक निर्बंध निर्माण होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.
यावेळी ग्रामस्थांनी संस्थानच्या मालकीच्या पूर्व भागातील आरक्षित जागेवर श्रीराम-श्रीकृष्ण मंदिरासह साईबाबांचे भव्य संग्रहालय (म्युझियम), ध्यानकेंद्र, पालखी सोहळ्यासाठी मोठा मंडप व भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची मागणी केली. त्यामुळे शिर्डीच्या सर्व दिशांनी विकास होईल आणि भाविकांनाही अधिक सुविधा उपलब्ध होतील, असे मत त्यांनी मांडले.
ग्रामस्थांनी लेंडीबागेतील कृत्रिम रचना हटवून तेथील मूळ बागेचे स्वरूप जतन करण्याचीही मागणी केली. तसेच, लेंडीबागेच्या परिसरात मंदिर उभारल्यास भाविकांना सहज प्रवेश मिळणे कठीण होईल, तर आरक्षित जागेवर उभारण्यात येणारे मंदिर भविष्यात धार्मिक पर्यटनासाठीही अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने साई संस्थानच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली असून, अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव संस्थानच्या समितीसमोर ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. आता याबाबत संस्थान प्रशासन अंतिम निर्णय काय घेते, याकडे शिर्डीकरांसह लाखो साईभक्तांचे लक्ष लागले आहे.