राहाता : समता पतसंस्थेतील कथित बनावट खाती आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राहाता शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, व्यवस्थापकाच्या अटकेनंतर ठेवीदार आणि नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे—”फक्त व्यवस्थापकांवरच कारवाई होणार, की या संपूर्ण प्रकरणातील मोठ्या जबाबदार व्यक्तींपर्यंतही तपास पोहोचणार?”
तपास यंत्रणेकडून पोलीस कोठडीदरम्यान आर्थिक व्यवहार, कथित बनावट खाती, कागदपत्रे, मंजुरी प्रक्रिया आणि वरिष्ठ स्तरावरील निर्णयांची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे. या चौकशीतून नवीन धागेदोरे समोर आल्यास तपासाची व्याप्ती आणखी वाढू शकते.
नागरिक आणि ठेवीदारांचे म्हणणे आहे की, कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारात केवळ अंमलबजावणी करणारेच नव्हे, तर निर्णय घेणारे आणि नियंत्रणाची जबाबदारी असलेले अधिकारी व पदाधिकारी यांची भूमिकाही तपासली गेली पाहिजे. तपासात ज्या-ज्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावे आढळतील,
त्यांच्यावर कोणताही भेदभाव न करता कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता सर्वांचे लक्ष एसआयटीच्या पुढील तपासाकडे लागले आहे. पोलीस कोठडीतून कोणती नवी माहिती समोर येते? तपासाचा धागा वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचतो का? आणि नागरिक ज्या “मोठ्या माश्यां”वर कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत, त्यांच्याबाबत काय निर्णय होतो? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“कायदा सर्वांसाठी समान आहे” हे तत्त्व प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची हीच खरी वेळ असल्याची भावना ठेवीदार आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
