कालिकानगरातील घरफोडीचा गुन्हाही उकलण्याच्या मार्गावर; साथीदारांचा शोध सुरू
शिर्डी, प्रतिनिधी : शिर्डी शहरातील कालिकानगर परिसरात राहणाऱ्या परराज्यातील बांधकाम मजुरांच्या खोलीचे कुलूप तोडून चार महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे ₹65 हजारांचा ऐवज चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत. रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याला लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सराईत आरोपी शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण याचाच या घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
शिर्डी पोलिसांच्या तपासात आरोपीकडून विविध गुन्ह्यांची उकल होत असून, त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
फिर्यादी आरीफुल लालू बिस्वास (वय 33, मूळ रा. पश्चिम बंगाल) हे कालिकानगर येथे भाऊ सारीजुल बिस्वास व इतर सहकाऱ्यांसह वास्तव्यास असून शिर्डी परिसरात सेंट्रिंगचे काम करून उदरनिर्वाह करतात.
फिर्यादीनुसार, 3 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सर्वांनी जेवण करून खोलीला कुलूप लावले आणि शेजारील कामाच्या ठिकाणी गेले. 4 ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास परत आल्यानंतर खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. मोबाईल व रोख रक्कम ठेवलेली पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीची माहिती त्यांनी तातडीने कामाचे मालक सुनील रामदास कोते यांना दिली. त्यानंतर शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा क्रमांक 681/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4) व 305(a) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये Vivo Y18, Oppo A58, Oppo A18, Realme P3 हे चार मोबाईल आणि रोख रक्कमेचा समावेश असून एकूण सुमारे ₹65 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
दरम्यान, रिक्षा लूट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण याची कसून चौकशी केली असता या घरफोडीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांकडून त्याच्याकडे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात असून, चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी आणि फरार साथीदारांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
सलग घडलेल्या घरफोडी व लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र सराईत आरोपीला अटक झाल्याने या गुन्ह्यांची उकल होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उर्वरित आरोपींनाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास शिर्डी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
