शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट; सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद
75 वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करून ₹7,200 लुटले; पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक; साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी व उपचारासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. बीड जिल्ह्यातील 75 वर्षीय वृद्ध शेतकरी विश्वनाथ लिंबा मैद यांना रिक्षामध्ये बसवून त्यांच्यावर व त्यांच्या नातवावर मारहाण करत रोख रक्कम लुटल्याच्या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडाकेबाज कारवाई करत सराईत आरोपी शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
फिर्यादी विश्वनाथ लिंबा मैद (वय 75, रा. मैदवाडी, ता. धारूर, जि. बीड) हे पोटाच्या आजारावरील उपचारासाठी नातू अंकुश अशोक मैद याच्यासह 2 ऑगस्ट रोजी शिर्डीत आले होते. उपचारानंतर 3 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता साई फेज-2 येथे जाण्यासाठी त्यांनी श्री साईनाथ रुग्णालय परिसरातून रिक्षा केली.
रिक्षामध्ये आधीच तीन अनोळखी इसम बसलेले होते. रिक्षाचालकाने “हे पुढच्या थांब्यावर उतरतील, अॅडजस्ट करून बसा,” असे सांगितल्याने दोघेही रिक्षात बसले. मात्र काही अंतर गेल्यानंतर तिघांनी अचानक वृद्ध आणि त्यांच्या नातवावर हल्ला चढवला. वृद्धाच्या तोंडावर थपडा मारून त्यांच्याकडील पिशवी हिसकावून घेतली. पिशवीत असलेली ₹7,200 रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत आरोपींनी दोघांना रिक्षातून खाली उतरवले आणि भरधाव वेगाने पसार झाले.
घटनेनंतर एका अनोळखी नागरिकाने मदतीचा हात पुढे करत दोघांना साई फेज-2 येथे सुरक्षित पोहोचवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्वनाथ मैद यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा क्रमांक 680/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(6) व 3(5) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी तपासाची सूत्रे स्वतः हाती घेतली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती, गोपनीय खबऱ्यांचे जाळे आणि विविध तपास पथकांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. अखेर या गुन्ह्यातील सराईत आरोपी शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण याला मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा आरोपी यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर येत असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिर्डी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली असून, या टोळीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास केला जात आहे.
शिर्डीत दररोज हजारो भाविक उपचार, दर्शन आणि विविध कारणांसाठी येत असतात. अशा परिस्थितीत रिक्षातून प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. सराईत आरोपीला तातडीने अटक करून शिर्डी पोलिसांनी तपासातील वेग आणि कार्यक्षमतेची चुणूक दाखवली असली, तरी फरार साथीदारांना जेरबंद करून संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. :
:आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय गुन्हे थांबणार कसे?
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत घेतात. शिताफीने तपास करून आरोपींना जेरबंद करतात. मात्र अनेक प्रकरणांत आरोपींना अल्पावधीत जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून, कायद्याचा धाक कमी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जाते.
लूटमार, जबरी चोरी, भाविक व वृद्ध नागरिकांवरील हल्ले यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तपास यंत्रणांच्या परिश्रमांना न्याय मिळावा, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी आणि सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्यानुसार प्रभावी व कठोर कारवाई होणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
