
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीत साईबाबांच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि सेवाभाव असतो. याच श्रद्धेचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी घटना सोमवारी श्री साईबाबा मंदिर परिसरात घडली. एका महिला साईभक्तीने कोणताही मोह न बाळगता ₹१५,४१० रोख रक्कम असलेली पर्स संरक्षण विभागाकडे जमा केली आणि संस्थानच्या तत्परतेमुळे काही वेळातच ती पर्स तिच्या मूळ मालकाच्या हाती सुखरूप पोहोचली.
सध्या शिर्डीत गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून उद्यापासून महोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे. अशा गर्दीतही प्रामाणिकपणा आणि मानवतेचा आदर्श घालून देणारी ही घटना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
मंदिरातील पारायण कक्षात पारायण करत असताना सौ. अनुपमा निरंजन (रा. बेंगळुरू) यांना एक पर्स आढळली. पर्समध्ये ₹१५,४१० रोख रक्कम, आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रे होती. कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता त्यांनी ती पर्स तात्काळ श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
संरक्षण विभागाने तत्काळ पर्समधील आधार कार्डच्या आधारे चौकशी सुरू केली. संबंधित पर्स श्री जी. व्ही. राजू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंदिर परिसरात उद्घोषणा करण्यात आली. काही वेळातच श्री. राजू संरक्षण कार्यालयात दाखल झाले. आवश्यक पडताळणी पूर्ण करून त्यांना त्यांची पर्स आणि त्यातील संपूर्ण ₹१५,४१० रोख रक्कम सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आली.
हरवलेली पर्स परत मिळाल्याने श्री. राजू यांनी सौ. अनुपमा निरंजन आणि श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाचे मनापासून आभार मानले. एका साईभक्ताच्या प्रामाणिकपणामुळे दुसऱ्या साईभक्ताच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आणि साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा, सबुरी, सचोटी आणि मानवतेच्या संदेशाचा जणू प्रत्यक्ष अनुभव सर्वांना आला.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी सौ. अनुपमा निरंजन यांचा सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
₹८५ लाखांहून अधिक किमतीच्या वस्तू परत करून जपला विश्वास
श्री साईबाबा संस्थानचा संरक्षण विभाग केवळ सुरक्षा व्यवस्थेपुरता मर्यादित नसून भाविकांच्या विश्वासाचेही रक्षण करत आहे. आजपर्यंत विभागाने सुमारे ₹८५ लाखांहून अधिक किमतीची रोख रक्कम, दागिने, मोबाईल, घड्याळे, महिलांच्या पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू शोधून त्यांचे मूळ मालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवल्या आहेत. संरक्षण विभागाच्या या सेवाभावी कार्याचे विविध प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी कौतुक केले आहे.
संरक्षण विभाग प्रमुख श्री. रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर, भक्तनिवास आणि संस्थानच्या विविध ठिकाणी सापडलेल्या हरवलेल्या वस्तू शोधून त्या संबंधित भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा प्रत्येक कर्मचारी साईभक्तांना सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी दर्शनाचा अनुभव देण्यासाठी समर्पित भावनेने सेवा बजावत आहे.
“साईसेवा म्हणजेच मानवसेवा” या ब्रीदवाक्याला साजेशी ही घटना केवळ हरवलेली पर्स परत मिळाल्याची नाही, तर प्रामाणिकपणा, विश्वास आणि सेवाभावाचा जिवंत संदेश देणारा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे.
