शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, शांतता राखावी आणि कोणताही गोंधळ होऊ नये, असे स्पष्ट आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले.

शिर्डी नगरपरिषदेमध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहितेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी सतीश दिघे, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔸 प्रचारासाठी परवानग्या आणि नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
आहेर म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी प्रचारातील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
📌 प्रचार सभांसाठी व तंबू उभारणीसाठी पोलीस व नगरपरिषदेची परवानगी आवश्यक आहे.
📌 प्रचार कार्यालय, वाहन, ध्वनीक्षेपक आणि हेलिकॉप्टर वापरण्यासाठी स्वतंत्र परवानग्या घेणे बंधनकारक आहे.
📌 मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रचारास सक्त मनाई आहे.
📌 धार्मिक स्थळांवर प्रचार करणे तसेच वैयक्तिक टीका, प्रलोभन किंवा धार्मिक भावना भडकवणारे मुद्दे टाळावेत.
🔸 नामनिर्देशन व अर्ज प्रक्रियेबाबत माहिती
निवडणूक अर्ज सादर करण्याची मुदत १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर अशी असून,
१७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज ऑनलाइन भरून प्रिंट घेऊन स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे.
शपथपत्रातील प्रत्येक रकाना पूर्ण भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रचाराची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रोजी सायं. ५.३० वाजता संपणार असून त्यानंतर सर्व बॅनर, पोस्टर आणि प्रचार साहित्य काढून टाकणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
🔸 खर्च मर्यादा व सोशल मीडिया नियंत्रणाबाबत सूचना
प्रत्येक उमेदवारास राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मर्यादेतच खर्च करण्याची परवानगी आहे.
निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत खर्चाचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
मतदार यादीतील दुबार नावे पडताळून एकच नाव कायम ठेवले जाईल, अशी माहितीही श्री. आहेर यांनी दिली.
सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचार करताना,
📺 व्हिडिओ किंवा जाहिरात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
अन्यथा संबंधित प्रचार साहित्य प्रसारित करता येणार नाही.
🔸 शांततेत, पारदर्शकतेत निवडणूक पार पाडा — आवाहन
“निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्व पक्ष, उमेदवार व नागरिकांनी शांततेत, पारदर्शकतेत आणि आदर्श पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही,”
असे ठाम मत उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी व्यक्त केले.

