शिर्डी (प्रतिनिधी )
शिर्डीत सध्या एका आर्थिक कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे, ह्या कंपनीचा संचालक कोण आणि ही कंपनी नेमकी कुणाची याची साधी चौकशी न करता केवळ दोन वर्षात दामदुप्पट पैसे मिळतात तर भरघोस व्याजही मिळते. या अमिषाला बळी पडत अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली असल्याचं सामोरं आले आहे.
या आर्थिक कंपनीत पैसे गुंतविण्यासाठी संस्थानचा एक कर्मचारी असून त्याने संस्थानमधील अधिकारी, कर्मचारी व शिर्डीतील अनेक नामवंत ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गातील इसमांना या मोहजालात अडकविले असून या सर्वांच्या माध्यमातून अंदाजे दिडशे ते दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक या आर्थिक कंपनीत झाली असल्याची चर्चा येथे सुरु आहे. मात्र ही अधिकृत की अनधिकृत कंपनी आहे याबाबत आता उलट सुलट चर्चा होत आहे.
ही बाब तेंव्हा सामोरं आली कि, ज्यावेळी हे पैसे घेणारा इसम कि ज्याला सर म्हणून ओळखतात हाच सराला आता कंपनीत तोटा झाला आणि तो चक्क हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती झाला, विशेष बाब म्हणजे याला भेटण्यासाठी अनेक दिग्गजांची रिघ लागली होती तर काहींना आपली फसवणूक होऊन पैसे बुडण्याच्या भीतीने ग्रासले आहे.
मात्र जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत हा घोटाळा अजूनही गुलदस्त्यात आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार व पोलीस प्रशासन वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक व्यव्हारात फसवणूक होऊ नये म्हणून विशेष सूचना देऊनही अनेकजण फसवणूकीला बळी पडत आहे. शिर्डीतील ह्या कंपनीतील सर हा फक्त रोख रक्कम घेत होता
तर अनेकांनी आपल्याकडील दाग दागिने व बचत केलेली लाखो रुपयांची रक्कम या सराच्या माध्यमातून गुंतविली असून, हा पैसा ब्लॅकचा आहे कि व्हाईट याचाच फायदा घेऊन सराने दिडशे ते दोनशे कोटी रुपये जमा करून गुंतवणूकदारांना व्याजाचे व दामदुपटीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होता.
मात्र आता सरांची कंपनी डबघाईस आली असून शिर्डीत मुंबईच्या टोरेस घोटाळ्याची पुनरावृत्ती होते कि काय अशीच चर्चा अनेक ठिकाणी सुरु असून या चर्चेमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे . अनेक गुंतवणूकदारांनी आपले लाखो, करोडो रुपये हे रोख रकमेच्या स्वरूपात दिल्याने उद्या भविष्यात इतके पैसे आले कोठून आणि विना टॅक्सची ही रक्कम तुम्ही दिलीच कशी, या प्रश्नांची भीती असल्याने कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही.
त्यामुळे ही आर्थिक स्कीम आता स्कॅम होणार नाही ना! अशी चर्चा आता गुंतवणूकदारांमध्ये होत आहे. शिर्डी व परिसरात असाच शिवा नावाच्या व्यक्तीने अनेकांना कोट्यावधी रुपयाला गंडवले होते.हा ही तसाच प्रकार आहे का? याची आर्थिक चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणाचा तपास संबंधित विभागाने, शासकीय यंत्रणेने करणे गरजेचे आहे .असे आता सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.