
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज, मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे संघटनांचे वर्चस्व असलेल्या काही एसटी स्थानक-आगारातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळावी या आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक ७ ऑगस्ट रोजी झाली. २० ऑगस्टला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.
मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने ३ सप्टेंबरपासून होणाऱ्या आंदोलनात गणेशभक्तांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे, असे एसटी कामगार संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.