अहिल्यानगर | प्रतिनिधी :
नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट कामावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. खासदार निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ‘टक्केवारी’च्या आरोपावरून थेट सवाल उपस्थित केला आहे. रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि टक्केवारीच्या आरोपांवरून आता जनतेसमोरच सत्य मांडण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका लंके यांनी घेतली आहे.

‘साईबाबांवर हात ठेवून सांगा… टक्केवारी कोणी मागितली?’
“साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या आणि सांगा, टक्केवारी कोणी मागितली?” असा थेट सवाल लंके यांनी विखे यांना केल्याने या प्रकरणाला चांगलीच धार आली आहे.
रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा नेमकी टक्केवारी कोणी मागितली, कोणाकडून मागितली आणि कोणासाठी मागितली, हे जनतेसमोर स्पष्ट करा, असे आव्हानच लंके यांनी विखे गटाला दिल्याचे सांगितले जात आहे.
रस्ता जनतेच्या पैशातून; मग दर्जाचा हिशेबही जनतेसमोर द्या!
नगर-मनमाड महामार्ग हा सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या कामासाठी जनतेचा पैसा खर्च होत असताना कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी लंके यांच्या भूमिकेतून पुढे आली आहे.
“जनतेच्या पैशातून रस्ता होतोय; त्यामुळे त्याच्या प्रत्येक रुपयाचा आणि प्रत्येक कामाचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे,” असा मुद्दा लंके यांनी उपस्थित केला आहे.
‘टक्केवारी’चा आरोप खरा की खोटा? आता विखेंनीच स्पष्ट करावे!
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात; मात्र टक्केवारीसारखा गंभीर आरोप होत असेल तर त्याचा खुलासा करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे, अशी भूमिका लंके यांनी घेतली आहे.
विखे आणि लंके यांच्यातील राजकीय संघर्ष यापूर्वीही अनेकदा उफाळून आला आहे. नगर-मनमाड महामार्गाच्या प्रश्नावरून अलीकडेच लंके यांनी सुजय विखे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.
आता जनतेचा सवाल एकच…
टक्केवारीची चर्चा नेमकी कुठून सुरू झाली?
कोणी मागितली?
कोणाकडे मागितली?
आणि त्याचा पुरावा काय?
या प्रश्नांची उत्तरे राजकीय आरोपांच्या पलीकडे जाऊन ठोस पुराव्यांसह जनतेसमोर यायला हवीत.
दरम्यान, नगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. त्यामुळे ‘टक्केवारी’च्या आरोपावर आता विखे काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत सदस्यही नसताना श्रेय घेणे कितपत योग्य?’
“ग्रामपंचायत सदस्यही नसताना एखाद्या कामाचे श्रेय घेणे हे कितपत योग्य आहे? या रस्त्याच्या कामासाठी मी स्वतः पाठपुरावा केला आहे. त्यामुळे श्रेयवाद करण्यापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम दर्जेदार झालेच पाहिजे आणि ते दर्जेदार करून घेणार, हा माझा निर्धार आहे.” — निलेश लंके, खासदार
दैनिक साई दर्शनचे सवाल
टक्केवारी कोण घेतो आणि कोण देतो, यावर वाद घालण्यापेक्षा आधी नागरिकांचे जीव वाचवा!
नगर–मनमाड रस्त्याची दुरवस्था वर्षानुवर्षे कायम आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेक कुटुंबांनी आपला मुलगा, मुलगी, बहीण, आई, वडील, भाऊ आणि मामा गमावले आहेत. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?
आठ आमदार, दोन खासदार असूनही रस्त्याची दुर्दशा कायम का? हा सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे.
रस्त्याच्या कामातील टक्केवारी कोण घेतो आणि कोण देतो, हा राजकीय वाद नंतरही करता येईल; मात्र सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो नागरिकांच्या जीवाचा!
दैनिक साई दर्शनचा स्पष्ट सवाल आहे—
रस्ता चांगल्या दर्जाचा, सुरक्षित आणि लवकरात लवकर पूर्ण कधी होणार?
राजकारण आणि श्रेयवाद बाजूला ठेवून लोकांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि जीविताची काळजी घेत नगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.