
राहाता, ः- तालुक्यातील वाळकी येथे रहाणारा साद शेख(वय१५) हा सध्या दहावीची परीक्षा देतो आहे. त्याच्या दोन्ही हातांना बोटे नाहीत तरीही त्याने वेगाने लेखन करण्याचे आणि पायाची मदत घेऊन आकृत्या काढण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्याला एक तासाचा अधिक कालवधि दिलेला असतानाही त्याने मराठीचा पेपर अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ पंधरा मिनीटे उशीराने दिला.


त्याच्या लेखन कौशल्याने पर्यवेक्षक देखील चकित झाले. को-हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी असलेल्या साद ला घडवीण्यात त्याच्या कुटूंबियां बरोबरच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विजय शेटे यांचाही मोलाचा वाटा आहे.
साद ला जन्मापासून दोन्ही हातांना बोटे नाहीत.
एक अंगठा आहे मात्र त्याची हालचाल मर्यादित. त्याचे आजोबा चाॅंद टेलर यांनी मोठा खटाटोप केला. आहे त्या अंगठ्याची व्यवस्थीत हालचाल व्हावी यासाठी त्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. मात्र त्यात फारसे यश आले नाही. मात्र साद जिवनाची लढाई हरला नाही. त्याने लहानपणापासूनच बोटाशिवाय दोन्ही हात एकत्र करून प्रत्येक गोष्ट करण्याचे कौशल्य आत्मसात करायला सुरवात केली.
विशेष म्हणजे त्याच्या या जिद्दी स्वभावामुळे आज त्याचे बोटांवाचून फारसे काही आडत नाही. बोटे नसलेले दोन्ही हात एकत्र करून तो पेन धरतो आणि वेगाने लेखन करतो. आकृत्या रेखाटण्यासाठी जमिनीवर पासून पायाच्या मदतीने दोन्ही हातांनी धरलेल्या पेन्सिलच्या सहाय्याने भराभर आकृत्या रेखाटतो. त्याला शाळेचा डबा देताना मात्र पोळी किंवा भाकरीचे प्रत्येक घासाचे तुकडे करून द्यावे लागतात .मित्रांचे थोडे सहकार्य घेऊन तो शाळेत आरामात दुपारचे भोजन करतो.
सायकल देखील चालवतो.
तो शाळेत दाखल झाल्यावर , प्रा.विजय शेटे यांनी त्याच्यावर खास लक्ष केंद्रीत केले. त्याच्या लेखनाला वेग कसा येईल यासाठी मार्गदर्शन केले. साद ने वेगाने लेखन करण्याचे कौशल्य आत्मसात केले. तो शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. नववी च्या परिक्षेत त्याला ८५ टक्के गुण मिळाले. दहावीच्या परिक्षेत ९० टक्के गुण मिळवायचे त्याचे स्वप्न आहे.
प्रा,विजय शेटे(अध्यक्ष श्रीगणेश शैक्षणीक संकुल, को-हाळे, ता.राहाता) ः- दोन्ही हातांना एकही बोट नसताना ज्या जीद्दीने साद ने आपली शैक्षणीक प्रगती केली ती खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे.
श्रीगणेश शैक्षणिक संकुलातील स्काॅलर म्हणून साद ने आपली ओळख निर्माण केली. त्याचे मनोबल अतिशय उच्च दर्जाचे आहे. त्याला घडविण्यात आमच्या सर्व शिक्षकांना देखील आनंद वाटतो.
साद शेख( विद्यार्थी, श्रीगणेश शैक्षणीक संकुल) ः- दहावीच्या मराठी विषयाचा पेपर मी अन्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने दिला. रेषा आखणे आणि घड्या जुळवीणे यात थोडा वेळ गेल्याने पंधरा मिनीटांचा वेळ अधिक लागला. मी आत्मविश्वासाने दहावीची परीक्षा देतो आहे. दोन्ही हातांना बोटे नाहीत म्हणून माझे काही अडत नाही आणि अडणार देखील नाही.