
शिर्डी | प्रतिनिधी
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षांतराच्या निर्णयानंतर शिर्डीतील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली असून, “गद्दार”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. संतप्त शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत जाहीर निषेध नोंदवला.
“ज्या शिवसेनेने राजकीय ओळख दिली, ज्या मशाल चिन्हामुळे खासदारकी मिळाली, त्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम वाकचौरे यांनी केले आहे,” असा आरोप शिवसैनिकांनी केला. अनेक कार्यकर्त्यांनी दावा केला की, उमेदवारी देताना देखील त्यांनी पक्ष नेतृत्वाला वाकचौरे यांच्याबाबत सावध केले होते. मात्र काही नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांना संधी देण्यात आली आणि आज तीच संधी पक्षासाठी घातक ठरल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी शिवसैनिकांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत, “सामान्य शिवसैनिकांच्या भावनांचा सौदा करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही. मतदारांच्या विश्वासावर निवडून येऊन सत्तेसाठी पक्ष बदलणे म्हणजे जनतेच्या मतांशी केलेली गद्दारी आहे,” असा घणाघात केला.
संतप्त कार्यकर्त्यांनी वाकचौरे यांच्यावर पैशांसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी भूमिका बदलल्याचा गंभीर आरोप करत, “मतदारांनी दिलेला कौल हा शिवसेनेच्या विचारांना होता, व्यक्तीला नव्हता. त्यामुळे जनतेच्या विश्वासाशी खेळणाऱ्यांना आता मतदारच धडा शिकवतील,” असा इशारा दिला.
शिर्डीसह संपूर्ण मतदारसंघातील शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले असून, पक्षांतराच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सुरू आहे. “शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष काय असतो हे आगामी काळात दिसेल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात निर्माण झालेली नाराजी आता उघड बंडाच्या स्वरूपात समोर येत असून, शिर्डीच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे.
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षांतरानंतर शिर्डी मतदारसंघातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी उघडपणे आक्रमक भूमिका घेतली असून, दुसरीकडे शिंदे गटही आपली ताकद वाढविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी काळात शिर्डीत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असा थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वाकचौरे यांच्या निर्णयामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, कार्यकर्त्यांमधील आरोप-प्रत्यारोप, सभा, मेळावे आणि शक्तिप्रदर्शन यामुळे शिर्डीचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

