
शिर्डी शहरात काही काळापूर्वी मोटारसायकल चोरांनी उच्छाद मांडला होता आणि त्यानंतर मात्र पोलिस प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत मोटारसायकल चोरांचा बंदोबस्त केला आणि काही चोरट्यांना जेरबंद करत दररोज होणाऱ्या मोटारसायकल चोऱ्यांवर नियंत्रण मिळविले
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आता शिर्डीत सोनसाखळी चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून साई दर्शनासाठी आलेल्या दक्षिण भारतीय महिला भाविकांना लक्ष्य करत भरधाव वेगाने धूम स्टाईलने दररोज ठराविक ठिकाणी सोनसाखळी चोरीला जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे रात्रीची शेजारती सुटल्यानंतर पिंपळवाडी रोड,साई भक्त निवास, द्वारावती भक्त निवास अश्या मोक्याच्या ठिकाणी हे चोरटे पाळत ठेवून महिला भाविकांना लक्ष्य करत असल्याने पोलिस प्रशासनाने या चोरट्यांवर साध्या वेशातील पोलिस तैनात करून जेरबंद करण्याची मागणी पुढे येत आहे त्यातच रात्री 10:30 च्या सुमारास महावितरण च्या गलथान कारभारामुळे अचानक जाणारी वीज या चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून महावितरणच्या कारभारावर देखील ग्रामस्थांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे त्याचबरोबर शहरात मोठा गाजावाजा करत 21 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित केली असून विविध चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे शोभेचे बाहुले झाले आहेत की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे
अश्याच एका प्रकरणी दिनांक 20 मे रोजी कर्नाटक राज्यातून आलेल्या प्रेमा एच नामक महिला भाविक आपल्या कुटुंबासह साई मंदिरातून कर्नाटक भवन येथे आपल्या रूम वर जात असताना पिंपळवाडी रोड नारायण बाबा आश्रम परिसरात मोटारसायकल वर आलेल्या दोघा भामट्यांनी या महिला भविकाच्या गळ्यातील तब्बल 85 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेत पळून गेल्याने या भाविकांनी आरडा ओरड केली मात्र भरधाव वेगाने हे तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे महिला भाविक प्रेमा एच आणि त्यांचे जावई रवी यांनी सांगितले याबाबत त्यांनी शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0372/2024 प्रमाणे तक्रार दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 403 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहेत
मात्र या घटनेनंतर सदर साई भक्त कुटुंबीय अत्यंत नाराज झाले असून साई दर्शनाला आल्यानंतर अश्या पद्धतीने चोरट्यांनी तब्बल 7 लाखांच्या जवळपास किमतीचे सोने लंपास केल्याने शिर्डीत सुरक्षा व्यवस्था सुधारणे गरजेचे असल्याचे मत सदर भाविकांनी व्यक्त केले असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे तसेच आम्ही साईबाबांच्या दर्शनाला आलो आमची श्रद्धा बाबांवर आहे मात्र असे प्रकार शिर्डीत घडत असतील तर आम्ही कोणाच्या भरवशावर शिर्डीत यावे असा उद्विग्न सवाल देखील या भाविकांनी उपस्थित केलाय