

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम परिसरात कार्यरत सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत साईभक्ताची हरवलेली बॅग व त्यातील रोख रक्कम सुरक्षितपणे परत करून मानवतेचा आणि सेवाभावाचा उत्तम नमुना सादर केला आहे.
दि. 03 जून 2026 रोजी साई आश्रम येथील प्रसादालय परिसरात सुरक्षा रक्षक श्री. सोमनाथ कसबे हे नियमित गस्त घालत असताना त्यांना एक बेवारस बॅग आढळून आली. सदर बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये OPPO कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम 11 हजार 750 रुपये असल्याचे निदर्शनास आले.
श्री. कसबे यांनी कोणताही मोह न बाळगता सदर बॅग तत्काळ संरक्षण कार्यालयात जमा केली. त्यानंतर संरक्षण विभागाने चौकशी करून बॅगधारक साईभक्त अमरजीत कुमार भारती (रा. झारखंड) यांचा शोध घेतला. खात्री करून मोबाईल फोन व रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. हरवलेले साहित्य परत मिळाल्याने साईभक्तांनी संस्थान प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
याच दिवशी आणखी एक प्रामाणिकपणाची घटना घडली. साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात सुरक्षा कर्मचारी श्री. जालिंदर बोर्डे यांना 4 हजार 200 रुपये रोख रक्कम सापडली. त्यांनीही तत्काळ ती रक्कम कार्यालयात जमा करून आपले कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक वर्तन दाखवून दिले.
साईनगरीत दररोज लाखो भाविक ये-जा करत असताना सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांकडून दाखविण्यात आलेला हा प्रामाणिकपणा भाविकांच्या विश्वासाला अधिक बळ देणारा ठरला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे आणि प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

