
कोर्ट मॅरेजला नकार, तरुणांना घरात डांबून २.३० लाखांच्या खंडणीची मागणी; तीन महिला गजाआड
शिर्डी प्रतिनिधी : विवाहासाठी मुलगी शोधणाऱ्या तरुणांना लग्नाचे गोड स्वप्न दाखवत जाळ्यात ओढायचे, विश्वास संपादन करून पैसे उकळायचे आणि नंतर खंडणीसाठी ओलीस ठेवायचे, असा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यात उघडकीस आला आहे. लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक करून त्यांना घरात डांबून ठेवत तब्बल २ लाख ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला राहाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बारामती येथील ३० वर्षीय शेतकरी विवाहासाठी मुलगी शोधत असताना त्याचा संपर्क आरोपी रेश्मा केशव काटे हिच्याशी झाला. विवाहासाठी चांगल्या मुली असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मात्र, पुणे येथील मुलींच्या अपेक्षा जास्त असल्याचे सांगत तिने राहाता तालुक्यातील साकुरी शिवार येथे ओळखीची मुलगी असल्याचे सांगून फिर्यादीला तेथे बोलावले.
आरोपींनी सुरुवातीलाच फिर्यादीकडून ऑनलाइन पद्धतीने १२ हजार ५०० रुपये उकळले. त्यानंतर साकुरी येथील गोदावरी वसाहतीत नेऊन सुगंधा गायकवाड हिला विवाहासाठी दाखविण्यात आले. मुलीच्या कुटुंबाबाबत विचारणा केली असता, “तिला आई नाही, वडील दारू पितात, त्यामुळे तिचे सर्व कार्य आम्हीच पाहतो,” असे सांगून फिर्यादीची दिशाभूल करण्यात आली.
मुलगी पसंत पडल्याने फिर्यादीने कायदेशीर पद्धतीने कोर्ट मॅरेज करण्याची तयारी दर्शविली. मात्र, याच ठिकाणी आरोपी महिलांचा खरा चेहरा समोर आला. “कोर्ट मॅरेजची गरज नाही, आत्ताच घरात लग्न लावून देतो, पण त्यासाठी २ लाख ३० हजार रुपये द्यावे लागतील आणि मुलीला लगेच घेऊन जावे लागेल,” अशी अट आरोपींनी घातली.
या व्यवहाराबाबत संशय आल्याने फिर्यादीचे मित्र बाहेर पडताच आरोपी महिलांनी दबावतंत्राचा अवलंब केला. फिर्यादी व त्याच्या मित्राला घरातच डांबून ठेवण्यात आले. एवढेच नव्हे तर बाहेर गेलेल्या नातेवाईकांना फोन करून, “२ लाख ३० हजार रुपये द्या, अन्यथा तुमच्या लोकांना सोडणार नाही,” अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली.
सुदैवाने फिर्यादीच्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ राहाता पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता साकुरी येथील घटनास्थळी धाव घेत फिर्यादी व त्याच्या मित्राची सुटका केली. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेश्मा केशव काटे, मंगल अंकुश पठारे आणि सुगंधा कैलास गायकवाड या तिन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात या महिलांनी संगनमताने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले असून अशाच पद्धतीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. या टोळीमागे आणखी कोणी सूत्रधार आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
या संपूर्ण कारवाईमुळे विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या रॅकेटकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

