
शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथे नुकतीच संपन्न झालेली
महाराष्ट्र केसरी २०२५ ची स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. अंतिम आणि उपांत्य सामन्यामध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीदरम्यान शिवराजची पाठ न टेकताच त्याला पराभूत घोषित केल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी झालेल्या राड्यादरम्यान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती.

तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना सामना सोडला होता. दोघांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.मात्र आता पुन्हा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोघांमध्ये कुस्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.
पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदन, त्याने खेळण्याची तयारी दाखवली, हे खेळाडूच करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं असल्याचं तो म्हणाला. यातून जे समजायचं ते प्रेक्षक आणि जनता समजली असेल. पृथ्वीराजने घेतलेला निर्णय काय आहे, हे एखादा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान समजू शकतो.
परत ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना २५-२५ लाख देऊन त्यांचा योग्य तो सन्मान लावून जनतेच्या मनतील संभ्रम दूर होईल. शिवराजला वाटत आहे. त्याच्यावर अन्याय झाला आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्र केसरी झालो का? या सगळ्याच गोष्टीवर पडदा पडणार आहे.
पृथ्वीराज मोहोळ हा २०२५ चा महाराष्ट्र केसरी असून त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. महाराष्ट्रात जो काही वाद झालेला आहे. तो सांगलीत येऊन थांबवण्याची तयारी आम्ही केली आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये अशा घटना घडू नये. महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही सर्वात मोठी आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अशा घटनेमुळे बदनाम होईल. असे होऊ नये. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही महाराष्ट्रातील कुस्तीगीरांमधून बोलले जात आहे.