
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर पोलिस दलात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी त्यांच्या बदलीविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायप्राधिकरणात (मॅट) धाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या मुद्देमाल कक्षातील कर्मचाऱ्याने जप्त केलेल्या अमली पदार्थांचीच परस्पर विक्री केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नियमानुसार कबाडी यांची शिर्डी सुरक्षा विभागात बदली केली. मात्र या निर्णयालाच आता कबाडी यांनी न्यायालयीन आव्हान दिले आहे.
पोलिस दलात असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात इतके गंभीर प्रकरण घडले, त्याची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून बदली करण्यात आली तर त्यात गैर काय? जर प्रत्येक अधिकारी स्वतःच्या बदलीविरोधात न्यायालयात धाव घेऊ लागला, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे महत्त्व काय राहणार?
नुकतेच जिल्ह्यात रुजू झालेले पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अमली पदार्थांसारख्या गंभीर विषयात कठोर भूमिका घेत जबाबदारी निश्चित केली. अशा परिस्थितीत बदलीला आव्हान देणे म्हणजे प्रशासनाच्या अधिकारालाच प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रकार असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे.
“चोरी तो चोरी, ऊपर से सीना जोरी” अशी प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागली आहे. अमली पदार्थ प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा आधीच मलिन झाली असताना, संबंधित प्रकरणातील जबाबदारी निश्चित झाल्यानंतर झालेल्या बदलीवर आक्षेप घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मॅटमध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार असली तरी पोलिस दलातील शिस्त, जबाबदारी आणि वरिष्ठांच्या आदेशांचा सन्मान याबाबतचा हा वाद आता जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.
“अमली पदार्थ प्रकरणात जबाबदारी निश्चित, मग बदली चुकीची कशी?”
स्थानिक गुन्हे शाखेतील मुद्देमाल कक्षातून अमली पदार्थ विक्रीसारखा गंभीर प्रकार घडतो, शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित होते, वरिष्ठ अधिकारी बदली करतात आणि त्याच निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाते. अशा प्रकारांमुळे प्रशासनातील शिस्त आणि वरिष्ठांच्या अधिकारालाच आव्हान दिले जात असल्याची भावना पोलिस वर्तुळात व्यक्त होत आहे.


