
शिर्डी | प्रतिनिधी
राज्यात अन्नभेसळ, दूधभेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाईचा धडाका लावणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्याला आता सर्वसामान्य जनतेतूनही उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी संविधान डोक्यावर घेऊन श्रीरामपूर ते शिर्डी अशी पदयात्रा करत तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेला अनोख्या पद्धतीने समर्थन दिले.
भर उन्हात, हातात कोणताही राजकीय झेंडा नाही, तर डोक्यावर भारतीय संविधान आणि अंगावर संविधान तसेच तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ संदेश लिहिलेले फलक घेऊन अशोक लोंढे यांनी सुरू केलेली ही पदयात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. मार्गातील अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट उत्पादनांवर कारवाई होत असल्याने भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिर्डीत पोहोचल्यानंतर अशोक लोंढे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “तुकाराम मुंडे हे केवळ अधिकारी नसून संविधानाच्या मार्गावर चालणारे एक धाडसी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. अनेक अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून काम करतात, मात्र मुंडे साहेब प्रत्यक्ष मैदानात उतरून भ्रष्टाचार आणि भेसळीविरोधात लढा देत आहेत. महाराष्ट्राला अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “आज तुकाराम मुंडे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी संविधान डोक्यावर घेऊन श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा केली. शिर्डीत येऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली की, राज्यातील आणि देशातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांनीही मुंडे साहेबांप्रमाणे जनहितासाठी काम करावे.”
साईनगरी शिर्डीत पोहोचलेल्या या अनोख्या पदयात्रेची चर्चा सर्वत्र रंगली असून, संविधानावरील श्रद्धा, प्रामाणिक प्रशासनावरील विश्वास आणि समाजहितासाठीची तळमळ यांचे प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

चौकट
“डोक्यावर संविधान, मनात जनहिताचा विचार”
सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी तुकाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा करत संविधानाला वंदन केले. “भेसळमुक्त महाराष्ट्र आणि प्रामाणिक प्रशासन” हा संदेश देणारी ही पदयात्रा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे जनतेच्या भावना आणि संविधानावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

