
शिर्डी (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो भाविक श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शिर्डीकरांचे आद्य कर्तव्य मानले जाते.
राधाकृष्ण विखे तसेच सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराच्या विकासाला गती मिळाली असून महावितरण विभागाच्या अनेक समस्या यापूर्वी मार्गी लावण्यात आल्या आहेत.

मात्र सध्या वाढत्या उष्णतेमुळे शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती वापरासोबतच दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही गंभीर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा विनाकारण खंडित करू नये, तसेच तरीही यापुढे पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
हे निवेदन शिर्डीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई विष्णु थोरात यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री रोहित तायडे यांना दिले. यावेळी श्री तायडे यांनी विभागातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.आवश्यक असल्यास पूर्वसूचना देण्यात यावी, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी आणि नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
