आंध्रप्रदेशातील येल्लूर गावचे भाविक शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी गुरुवारी आले होते. साई बाबांचे दर्शन झाल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ते परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतून निघाले. सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते.
शुक्रवारी सकाळी सोलापूरात पोहोचले तेव्हा अनेक प्रवाशांना त्यांच्या बॅग गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या डिग्गीतून लंपास झाल्या असल्याचे निदर्शनास आले. जवळपास २५ प्रवाशांनी आपल्या बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोंधळ सुरू केला.खासगी बसमधील प्रवाशांनी बस थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली.
तेलगू भाषेमुळे प्रवाशांना मराठीत तक्रार सांगता येत नव्हती. पण झालेले नुकसान आणि हावभाव यावरून पोलिसांनी त्यांची व्यथा जाणून तेलगु भाषिक पोलीसाची मदत घेवून व्यथा ऐकून घेतली. या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे चारच्या सुमारास माढा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती.
चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता. एवढेच आम्हाला आठवते असे प्रवाशांनी तेलगू भाषा येणाऱ्या मराठी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारावर चालक आणि त्याचा सहकारी यांचे जबाब नोंदवले.प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बॅगा चोरीचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका तर करमाळा तालुका दरम्यान घडली आहे.