
अहिल्यानगर | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होण्याची शक्यता असून, परिस्थितीनुसार धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
सध्या जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून धरणांमध्ये वेगाने पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले.
प्रशासनाने महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
नागरिकांनी घ्यावयाची महत्त्वाची खबरदारी
नदी, ओढे, नाले, पूल, बंधारे आणि पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे.
धरणातून पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून सूचना मिळाल्यास त्याचे तात्काळ पालन करावे.
नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू सुरक्षित ठेवाव्यात.
लहान मुले, वृद्ध आणि जनावरे यांना नदीकाठी किंवा पुराच्या पाण्याजवळ जाऊ देऊ नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये; केवळ जिल्हा प्रशासन, हवामान विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.
वीज पडत असताना झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये.
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी त्वरित संपर्क साधावा.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, हवामानातील बदल लक्षात घेऊन धरणांतील पाणीसाठा आणि नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहावर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतले जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे आणि स्वतःची तसेच कुटुंबाची सुरक्षितता सर्वप्रथम प्राधान्याने जपावी.

