
शिर्डी | प्रतिनिधी
“अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र शिक्षणाकडे खर्च म्हणून नव्हे, तर भविष्यासाठी केलेली सर्वात मौल्यवान गुंतवणूक म्हणून पाहण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन श्रीगणेश शिक्षण संस्था, कोऱ्हाळे (शिर्डी बायपास)चे अध्यक्ष तथा शैक्षणिक मार्गदर्शक प्रा. विजय शेटे यांनी केले आहे.
‘शिक्षणातील आर्थिक साक्षरता’ या लेखमालेच्या पहिल्या भागातून त्यांनी विद्यार्थी, पालक आणि समाजासमोर शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे.
प्रा. शेटे म्हणतात की, आज अनेक पालक आणि विद्यार्थी “शिक्षण महाग आहे” या विचारामुळे उच्च शिक्षणापासून दूर राहतात. प्रत्यक्षात शिक्षणावर केलेला खर्च हा केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, विद्यार्थ्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया मजबूत करणारी गुंतवणूक असते. आज शिक्षणासाठी खर्च केलेला प्रत्येक रुपया उद्या आत्मविश्वास, स्वाभिमान, आर्थिक स्थैर्य आणि यशाच्या रूपाने अनेकपटींनी परत मिळतो.
आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी त्यांनी दोन तहानलेल्या कावळ्यांची गोष्ट सांगितली आहे. एका कावळ्याने दगड टाकून पाण्याची पातळी वाढवत मेहनतीने तहान भागवली, तर दुसऱ्याने परिस्थितीचा अभ्यास करून स्ट्रॉचा वापर करत कमी वेळात आपले ध्येय गाठले. या उदाहरणातून केवळ कष्ट नव्हे, तर योग्य माहिती, योग्य नियोजन आणि उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर यामुळेही यश मिळते, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.
शिक्षणाच्या बाबतीतही हीच बाब लागू होते. आज शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, फी सवलती, शैक्षणिक कर्ज, तसेच सामाजिक संस्था, ट्रस्ट आणि खासगी कंपन्यांकडून आर्थिक सहाय्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांची योग्य माहिती घेऊन त्यांचा लाभ घेतल्यास आर्थिक अडचण ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या आड येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रश्न पैशांचा नसून योग्य माहिती, जिद्द आणि बदललेल्या दृष्टिकोनाचा आहे. ज्याच्याकडे शिकण्याची इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी आहे, त्याच्यासाठी शिक्षणाचे अनेक मार्ग खुले आहेत,” असा आशावादी संदेश प्रा. विजय शेटे यांनी या लेखातून दिला आहे.
लेखमालेच्या पुढील भागात शिक्षणासाठी उपलब्ध आर्थिक योजनांची सविस्तर माहिती आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

