
शिर्डीतून समाजाला दिला आशेचा संदेश; ‘देऊळबंद 2’च्या कमाईतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
शिर्डी प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रचंड गाजत असलेला ‘देऊळबंद 2’ हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशाची शिखरे सर करत नाही, तर समाजाप्रती असलेली आपली बांधिलकीही जपत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. साईनगरी शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी आणि समाजहिताचा निर्णय जाहीर केला.

शेतकरी आत्महत्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणासाठी ‘देऊळबंद 2’ चित्रपटाच्या कमाईतील निधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला असून सामाजिक क्षेत्रातून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टी, मराठी माती आणि मराठी प्रेक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “मराठी माणूस, त्याची संस्कृती, त्याची श्रद्धा, त्याची भाषा आणि त्याची माती यांच्याशी जोडलेले विषय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. या मातीने आम्हाला भरभरून प्रेम दिले. आता समाजाचे काही देणे फेडण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
आजही राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येनंतर अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते, स्वप्ने तुटतात आणि भविष्य अंधारमय बनते. अशा मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
100 कोटी रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतल्याने ‘देऊळबंद 2’ हा चित्रपट केवळ मनोरंजनाचा विषय न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा चित्रपट ठरत आहे.
साईबाबांच्या कर्मभूमी असलेल्या शिर्डीतून झालेली ही घोषणा विशेष महत्त्वाची मानली जात आहे. “प्रथम मानवता धर्म” या भावनेतून घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून मराठी चित्रपटसृष्टीसमोर एक नवा आदर्श निर्माण करणारा आहे.
चित्रपटाच्या यशासोबत समाजातील गरजू मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आल्याने ‘देऊळबंद 2’ हा चित्रपट आता केवळ पडद्यावरच नव्हे तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यातही नवी आशा निर्माण करणार आहे.

