
शिर्डी (प्रतिनिधी) : साईबाबांच्या पवित्र प्रसादाच्या नावाखाली भाविकांना नेमके काय विकले जात आहे? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे शिर्डीतील प्रसाद व्यवसाय हादरला आहे. विविध विक्री केंद्रांमधून जप्त करण्यात आलेले पेढा प्रसादाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर दोषींवर थेट फौजदारी कारवाई होण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रसादाच्या गुणवत्ता, शुद्धता आणि उत्पादन प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईत विविध विक्री केंद्रांवरील पेढ्यांचे नमुने जप्त करण्यात आले. दररोज हजारो भाविक आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायावर आता संशयाची छाया पडली आहे.
विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने संबंधित विक्रेते, उत्पादक आणि पुरवठादार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रसाद तयार करताना वापरण्यात येणारे दूध, साखर व इतर घटकांचा दर्जा, उत्पादन केंद्रांतील स्वच्छता, साठवणूक व्यवस्था आणि विक्री प्रक्रियेचीही कसून चौकशी केली जात आहे. श्रद्धेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा अथवा भेसळयुक्त प्रसाद विकला गेला असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांना कायद्याचा कठोर फटका बसू शकतो.
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून अनेक विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डीसारख्या जागतिक धार्मिक स्थळावर भाविकांच्या श्रद्धेशी तडजोड झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून प्रयोगशाळेच्या अहवालाकडे आता संपूर्ण शिर्डीकरांसह लाखो साईभक्तांचे लक्ष लागले आहे. श्रद्धेच्या नावावर जर कोणी नफा कमावण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड केली असेल, तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

