
शिर्डी : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायणवाडी (नारायणबाग) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रवी नारायण कराळे यांनी साईबाबांप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त करत तब्बल ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा श्री साई चरणी प्रसाद स्वरूपात अर्पण केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री. कराळे हे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेत आहेत. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा घातक औषधांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या दर्जेदार आंब्यामुळे साईभक्तांना आरोग्यदायी आणि शुद्ध आमरसाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

या सेंद्रिय केशर आंब्यापासून तयार करण्यात आलेला स्वादिष्ट आमरस आजपासून पुढील तीन दिवस श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनासोबत भाविकांना दिला जाणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत साईभक्तांसाठी ही खास “आमरस मेजवानी” ठरणार असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साईबाबांच्या चरणी अर्पण झालेला हा आंबा केवळ फळांचा प्रसाद नसून श्रद्धा, सेवा आणि शुद्धतेचे प्रतीक असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. भक्तीभावातून केलेल्या या अनोख्या सेवेमुळे श्री. रवी नारायण कराळे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“साईंच्या प्रसादात गोडवा…
आणि भक्तीमध्ये सेंद्रिय सुवास!”

