
ईडी च्या ताब्यात असलेल्या भोंदू खरातने अखेर मौन सोडत विशेष न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. “समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरूनच विविध खात्यांमध्ये पैसे जमा केले,” अशी धक्कादायक कबुली खरातने न्यायालयासमोर दिल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, खात्यांवरील नॉमिनीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत खरातने हात वर केले.
दि. २० रोजी मुंबई येथील विशेष पीएमएलए न्यायालयात खरातला हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीशांनी “तुमच्यावर नेमके काय आरोप आहेत, हे तुम्हाला समजतेय का?” असा प्रश्न विचारला असता, आतापर्यंत शांत असलेल्या खरातने प्रथमच भूमिका मांडली.
“माझ्याकडे आलेले पैसे मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला दाखवले होते. ही सहकारी बँक असून येथे ९ टक्के व्याज मिळते, असे सांगून त्यांनीच मला विविध अकाऊंटमध्ये पैसे ठेवण्याचा सल्ला दिला,” असे खरातने न्यायालयात सांगितले. त्यानुसारच आपण वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचे त्याने स्पष्ट केले.मात्र, न्यायालयाने “जर सर्व व्यवहार नियमानुसार होते, तर या खात्यांना वारसदार (नॉमिनी) करण्यामागचे कारण काय?” असा सवाल उपस्थित करताच खरातने “त्याबाबत मला काहीच माहिती नाही,” असे उत्तर दिले. “आता तपास झाला आहे. मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढेच मला माहिती आहे,” असे सांगत त्याने जबाब झटकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, खरातची ईडी कोठडी मंगळवारी (दि. २६) संपत असल्याने त्याला पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी ईडी आणखी कोठडीची मागणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात ईडी ने मोठी कारवाई करत दि. १३, १४, १७, २३ एप्रिल तसेच ५ आणि १८ मे रोजी शिर्डी, राहाता, नाशिक, पुणे यांसह तब्बल १३ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत १३.९२ कोटी रुपयांची रोख रक्कम, ५००० अमेरिकी डॉलर, १.१२ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले होते. तसेच २.२५ कोटींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉडरिंग झाल्याची शक्यता व्यक्त करण्या
त येत असून, ईडी त्या दिशेने सखोल तपास करत आहे. खरातच्या कबुलीनंतर आता समता पतसंस्थेतील नेमके कोण-कोण रडारवर येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

