
शिर्डी | प्रतिनिधी
एकीकडे ‘आदर्श ग्राम’, ‘स्मार्ट ग्राम’, ‘विकासाभिमुख ग्रामपंचायत’ अशा घोषणांचा गाजावाजा… सोशल मीडियावर विकासाच्या पोस्टांचा पाऊस… आणि दुसरीकडे गावात दिवसाढवळ्या घरफोड्या, रात्री अंधारात बुडालेल्या गल्ली, बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि नागरिकांच्या मनात वाढत चाललेली भीती… अशी संतापजनक परिस्थिती सध्या सावळीविहीर बुद्रुक गावात निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावात चोरी आणि घरफोड्यांच्या घटना वाढत असून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ग्रामसुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्री अनेक भागात स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने गाव अंधारात बुडत असून याचाच फायदा चोरटे घेत असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
दरम्यान, या भीतीच्या वातावरणात सावळीविहीर परिसरात पुन्हा एकदा धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद कोपरे यांच्या घराचा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून सुमारे ३० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच साड्या चोरून नेण्यात आल्या. विशेष म्हणजे घरफोडी करताना कोणताही आवाज न करता चोरटे पसार झाल्याने परिसरात एखादी सराईत टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भारती सोळंके यांनी घटनास्थळी भेट दिली.
मात्र या घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “गाव स्मार्ट झालं म्हणता, मग CCTV बंद का? स्ट्रीट लाईट्स अंधारात का? चोरट्यांना मोकळं रान कोणी दिलं?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. “फक्त पुरस्कार, बॅनर आणि फोटोसेशनमुळे गाव आदर्श होत नाही… नागरिक सुरक्षित असणं हीच खरी विकासाची ओळख असते,” अशी तीव्र प्रतिक्रिया आता गावातून उमटू लागली आहे.
शिर्डी आणि राहाता तालुक्यात सातत्याने वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस गस्त, गुप्त माहिती यंत्रणा आणि ग्रामसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. “रात्रीची गस्त नेमकी कुठे असते?”, “सीसीटीव्ही बंद असताना ग्रामपंचायत काय करते?” असे सवाल आता उघडपणे विचारले जात आहेत.
गावातील बंद सीसीटीव्ही तात्काळ सुरू करावेत, बंद स्ट्रीट लाईट्स दुरुस्त कराव्यात, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

