
हिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्वतः पुढे येत अफवांना पूर्णविराम दिला आहे. “जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असा स्पष्ट आणि कडक इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. मात्र प्रशासनाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सांगितले की, “इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. अफवांमुळे विनाकारण गर्दी करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
प्रशासनाने नागरिकांना ‘पॅनिक बायिंग’ टाळण्याचे आवाहन करत, आवश्यक तेवढेच इंधन घेण्याचे सांगितले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, सोशल मीडियावर अप्रमाणित संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पेट्रोल पंप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर यांनीही नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

