
साईनगरी शिर्डीत साईभक्तांची श्रद्धा आणि भावनांचा गैरफायदा घेत उघडपणे आर्थिक लूट करणाऱ्या टोळ्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, मंदिर परिसरातील दोन नंबर गेटसमोरील साई सेवा फुल भंडार या दुकानातून एका हारासाठी तब्बल १९०० रुपये आकारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिर्डीकर आणि साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, “फक्त पैसे परत करून प्रकरण मिटवायचं आणि पुन्हा भाविकांना लुटायचं का?” असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना शिर्डीत प्रवेश करताच काही एजंट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गाठलं. “दोन मिनिटांत दर्शन करून देतो”, “व्हीआयपी मार्गाने आत सोडतो”, “गाडी पार्किंगची व्यवस्था करतो” अशी आमिषं दाखवत त्या भाविकांना थेट संबंधित दुकानात नेण्यात आलं. तेथे हार, फुलं आणि प्रसाद घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. श्रद्धेपोटी आणि अनोळखी ठिकाण असल्याने भाविकांनी साहित्य घेतलं; मात्र नंतर एका हारासाठी तब्बल १९०० रुपये घेतल्याचं समोर आलं.
धक्कादायक म्हणजे, शिर्डी नगरपरिषदेकडून मंदिर परिसरात हार-फुलांचे अधिकृत दरफलक लावण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही दुकानदारांकडून सर्रास मनमानी दर आकारले जात असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे. “दरफलक फक्त दिखाव्यासाठी आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
या प्रकारानंतर संबंधित साईभक्तांनी श्री साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्याशी संपर्क साधला. माळी यांनी तत्काळ दखल घेत सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली आणि संबंधित दुकानावर अधिकाऱ्यांना पाठवलं. अखेर दुकानदाराला घेतलेले सर्व पैसे परत करावे लागले. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला असला, तरी मूळ प्रश्न कायम आहे — “पैसे परत केले म्हणजे गुन्हा संपला का?”
शिर्डीत अनेक दिवसांपासून मंदिर परिसरात काही एजंट, दलाल आणि दुकानदार यांचं साखळी रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. भाविकांना गाठायचं, व्हीआयपी दर्शनाचं आमिष दाखवायचं, दुकानात नेऊन अव्वाच्या सव्वा दराने हार-फुलं विकायची आणि नंतर भाविकांनी आवाज उठवला तर पैसे परत करून विषय दाबायचा — हा प्रकार नवीन नसल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत.
आता या प्रकरणानंतर शिर्डीकरांनी थेट कठोर कारवाईची मागणी केली आहे. “भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर फक्त समज देऊन चालणार नाही. संबंधित दुकानाचा परवाना रद्द करा, दुकान सील करा, फौजदारी गुन्हे दाखल करा आणि मंदिर परिसरातील दलालांचं नेटवर्क उद्ध्वस्त करा,” अशी जोरदार मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, साईबाबांच्या नावावर चालणाऱ्या या लुटमारीमुळे शिर्डीची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. लाखो भाविक श्रद्धेने शिर्डीत येतात; मात्र काही लालची दुकानदार आणि एजंटमुळे साईनगरी बदनाम होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
आता प्रश्न एकच —
अति कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रशासन या प्रकरणात खरोखर कठोर कारवाई करून दुकान सील करणार का, की नेहमीप्रमाणे काही दिवसांनी पुन्हा साईभक्तांची लूट सुरूच राहणार?

