
शिर्डी (वार्ताहर):
साईनगरी शिर्डीत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं असून शेतकऱ्याच्या ‘काळ्या आई’वरच डल्ला मारल्याचा आरोप होत आहे. स्वतःला भोंदूबाबा म्हणवणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांच्यावर गोंदकर कुटुंबीयांची वडिलोपार्जित शेती संगनमताने, फसवणुकीने आणि कट रचून बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिर्डी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून “शेतकऱ्याला न्याय द्या” असा जनतेचा आवाज आता बुलंद होत आहे.
भोळेपणाला जाळ्यात अडकवून ‘डील’ फिक्स?
निघोज हद्दीत रावसाहेब गोंदकर यांची तब्बल ४ एकर वडिलोपार्जित शेती होती. या जमिनीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र परिसरात पंचतारांकित हॉटेल उभं राहिल्यानंतर या जमिनीचं सोनं झालं… आणि इथंच कथेला कलाटणी मिळाली.
गोंदकर कुटुंबीयांच्या आरोपानुसार, काही मध्यस्थांनी आधी गोंदकर यांच्या मुलाशी जवळीक वाढवली. त्याला दारूच्या आहारी लावून नशेत ठेवण्यात आलं. आणि याचाच फायदा घेत संगनमताने जमिनीचा व्यवहार कॅप्टन अशोक खरात यांच्या नावावर करून घेतला गेला.
हा व्यवहार २२ ऑगस्ट २०२३ रोजी सुमारे ५ कोटी ५२ लाख रुपयांना झाल्याचं दाखवलं गेलं—पण प्रत्यक्षात त्या पैशांचा एक रुपयाही कुटुंबाच्या हातात आला नाही, हा सर्वात मोठा धक्कादायक आरोप आहे.
‘पेपरवर कोटी, हातात शून्य!’ – व्यवहार की फसवणूक?
या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य तब्बल ४० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. एवढ्या मोलाच्या जमिनीचा व्यवहार संशयास्पद पद्धतीने, अपुऱ्या माहितीत आणि नशेत असताना करण्यात आल्याने संपूर्ण व्यवहारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
कुटुंबीयांच्या मते, रावसाहेब यांच्या मुलाच्या एका मित्रानेच संपूर्ण व्यवहार हाताळला आणि पैसे स्वतःकडेच ठेवले. त्याच मित्राने कॅप्टन खरात यांच्याकडून २ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. कर्ज फेडता न आल्याने गोंदकर कुटुंबाची जमीन ‘तारण’ म्हणून देऊन अखेर विक्री केल्याचा प्रकार उघड होत आहे.
“हा सगळा कट पूर्वनियोजित होता,” असा थेट आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
“आमची काळी आई परत द्या!” – कुटुंबाची हृदयद्रावक हाक
या घटनेनंतर गोंदकर कुटुंबीय अक्षरशः कोलमडून पडले आहेत.
प्रयागबाई गोंदकर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या,
“ही जमीन आमची काळी आई आहे. आमच्या पूर्वजांनी कष्टानं मिळवलेली आहे. पण काही लोकांनी आमच्या मुलाचा गैरफायदा घेत ती हिरावून घेतली. आम्हाला फक्त न्याय हवा… आमची जमीन परत द्या!”
ज्योती गोंदकर यांनीही संताप व्यक्त करत सांगितलं,
“जर आम्ही स्वतः जमीन विकली असती तर आज आमच्याकडे पैसा असता. पण दारू पाजून आमची शेती हिसकावली. आता ही जमीन परत मिळाली नाही तर आम्ही अक्षरशः रस्त्यावर येऊ!”
स्थानिकांचा संताप उफाळला; लढ्याची घोषणा
या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवक नंदू भाऊ गोंदकर, प्रमोद गोंदकर, रमेश गोंदकर यांनी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभं राहत “जमीन परत मिळेपर्यंत लढा सुरूच राहील” असा इशारा दिला आहे.
पोलीस आणि एसआयटीकडे तक्रार; आता काय कारवाई?
गोंदकर कुटुंबीयांनी शिर्डी पोलीस तसेच नाशिक एसआयटीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोठा सवाल : शेतकऱ्याच्या ‘काळ्या आई’ला न्याय कधी?
कोट्यवधींच्या जमिनीवर डोळा ठेवून भोळ्या शेतकऱ्यांना जाळ्यात ओढून फसवणूक होत असल्याचा हा प्रकार समोर आल्याने प्रशासन आणि यंत्रणांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे—
गोंदकर कुटुंबाला न्याय मिळणार का? आणि ‘काळी आई’ परत मिळणार का? 🔥

