
शिर्डी : सध्या देशभरात आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत चर्चा सुरू असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून घरगुती गॅसचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन श्री साई गणेश गॅस एजन्सी, शिर्डीचे संचालक बबनराव भुसारी यांनी केले आहे.
भुसारी यांनी सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, आखाती देशांमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीतील अडथळे आणि इंधन पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी यामुळे काही भागात एलपीजी गॅसच्या वितरणावर तात्पुरता परिणाम जाणवत आहे. मात्र या परिस्थितीचा गैरसमज करून नागरिकांनी घाबरून जाऊन गॅसचा साठा करण्याचा किंवा अनावश्यक वापर वाढवण्याचा प्रयत्न करू नये.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाने घरगुती गॅसची बचत करण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. अन्न शिजवताना भांड्यांवर झाकण ठेवणे, शक्यतो प्रेशर कुकरचा वापर करणे, एकावेळी जास्त प्रमाणात स्वयंपाक करून गॅसची बचत करणे, तसेच पर्यायी साधन म्हणून इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर करणे यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची बचत होऊ शकते. स्वयंपाक करताना गॅस वाया जाणार नाही याचीही प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
भुसारी यांनी स्पष्ट केले की, शिर्डी शहर व एजन्सीच्या कार्यक्षेत्रात आजपर्यंत घरगुती गॅसची कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.
सध्या सिलेंडर भरण्यासाठी कोणतीही प्रतीक्षा यादी नसून ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर नियमानुसार प्रत्येकाला सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे. गॅस कंपन्या आणि स्थानिक एजन्सी नागरिकांना नियमित व सुरळीत पुरवठा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
घरगुती गॅसचा गैरवापर टाळण्यासाठी गॅस कंपन्यांनी दोन सिलेंडरच्या वितरणामधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश गॅसचा योग्य वापर होऊन सर्व ग्राहकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध व्हावा हा आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, संयम राखावा आणि आवश्यक तेवढाच गॅस वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले. सध्याची परिस्थिती तात्पुरती असून लवकरच पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वासही बबनराव भुसारी यांनी व्यक्त केला.


