
२००३ साली दुष्काळग्रस्त भागाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत निळवंडे कालव्याच्या दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले होते. त्या काळात काही नेत्यांचा या कार्यक्रमाला विरोध असतानाही अजितदादांनी दिलेला शब्द पाळत सकाळी ठीक ८.३० वाजता कार्यक्रमस्थळी हजेरी लावली, अशी आठवण डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काढली.
या दुष्काळी परिषदेसह प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांच्या कार्यकाळात राहाता नगरपालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटनही मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनापुरते मर्यादित न राहता अजितदादांनी प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम योग्य दर्जाचे झाले आहे की नाही, स्वच्छता व निटनेटकेपणा राखला आहे का, याची काटेकोर तपासणी करून आढळणाऱ्या त्रुटी त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडल्या, असे डॉ. पिपाडा यांनी सांगितले.

अजितदादा हे अत्यंत दिलखुलास, परखड आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते. निर्णयक्षमता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कामाबाबत कोणतीही तडजोड न करणारी त्यांची कार्यशैली सर्वांसाठी आदर्शवत होती, असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झाली असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. दादांचे कार्य, शिस्त आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

