
कोपरगाव | प्रतिनिधी :
कोपरगाव येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील समता नागरी पतसंस्था सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, संस्थेवर थेट आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्याचे आरोप झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. काही कर्जदारांनी उघडपणे केलेल्या आरोपांमुळे संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेवीदारांमध्ये आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आहेत की नाही, याबाबत तीव्र संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
या आरोपांचा थेट फटका श्रीरामपूर येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेला बसल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पतसंस्थेबाबत सुरू असलेल्या नकारात्मक चर्चांमुळे आणि घोटाळ्याच्या गंभीर आरोपांमुळे घाबरलेल्या सभासदांनी मोठे पाऊल उचलत आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी शाखेकडे धाव घेतली. सकाळपासूनच शाखेसमोर सभासदांची अक्षरशः गर्दी उसळली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात लाखो रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या गेल्या, त्यामुळे पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणि तरलतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “आज पैसे नाही काढले, तर उद्या मिळतील की नाही?” या भीतीपोटी अनेक सभासदांनी दीर्घकाळासाठी ठेवलेली बचतही तातडीने काढून घेतल्याचे समजते.
काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील ही पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने, प्रशासन, सहकार विभाग आणि तपास यंत्रणा यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपांची चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहणार का? – हे प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
या प्रकरणाचे पुढील पडसाद सहकार क्षेत्रात मोठ्या हालचाली घडवू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत असून, समता नागरी पतसंस्थेच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेचे सावट अधिक गडद होत चालले आहे.

