
शिर्डी : बारामती येथून एका
विवाह समारंभास उपस्थितीत राहाण्यासाठी येथे आलेल्या अर्चना टाटिया यांचे सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीस गेले. गेल्या २९ जून रोजी साईमंदिराजवळ ही घटना घडली. हे गंठण गाडीत ठेवून त्या साईदर्शनासाठी गेल्या होत्या; मात्र परत येईपर्यंत ते चोरीस गेले. याबाबत भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलीसांनी फिर्याद दाखल करून घेतली.
याबाबत माहिती देताना डॉ. पिपाडा म्हणाले, शिर्डीत चोऱ्या होऊनही फिर्याद दाखल करून
घेण्यास टाळाटाळ केली जाते. गंठण चोरीला गेल्यानंतर टाटिया कुटूंबियांसमवेत फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या; परंतु त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याशी संपर्क केला. याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो व घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी फिर्याद घेण्यात आली. अशा प्रकारे फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे गुन्हे घडूनही त्याची नोंद होत नाही. आपण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत.