
शिर्डी, दि. ७ सप्टेंबर २०२६ : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या अपघात विमा योजनेचा पुन्हा एकदा कर्मचाऱ्याला मोठा आधार मिळाला आहे. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये कार्यरत कायम कर्मचारी बाबूराव गणपत राऊत यांना अपघात विम्यापोटी तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
श्री साईबाबा संस्थानने इंडिया पोस्ट पेमेंट बँक, शाखा श्रीरामपूर यांच्या माध्यमातून संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची जनता अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. याच योजनेअंतर्गत राऊत यांना विमा दाव्याचा लाभ मिळाला.
अपघातानंतर संस्थानची विमा योजना ठरली आधार
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी केलवड येथील राहत्या घरी बाबूराव राऊत यांचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत त्यांच्या हाताच्या पंजाचा काही भाग निकामी झाला. अशा कठीण प्रसंगी संस्थानने कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या अपघात विमा योजनेमुळे त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळाला.
या विमा दाव्याची ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम असलेला धनादेश दि. ७ सप्टेंबर रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती प्रिती अग्रवाल (IPoS) यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्याकडे सुपूर्द केला.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला संस्थानचे प्राधान्य
यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे आणि प्रभारी कामगार अधिकारी शरद डोखे उपस्थित होते.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वतीने मुख्य व्यवस्थापक राजेंद्र आघाव, एपीएमजी अविनाश फाकरे, पोस्ट अधीक्षक उमेश जनवडे, आयपीपीबी शाखा व्यवस्थापक काशीविश्वनाथ जी तसेच राष्ट्रीय प्रमुख अनंत कुमार (आदित्य बिर्ला विमा) उपस्थित होते.
अपघात कधी, कुठे आणि कोणाच्या आयुष्यात येईल हे सांगता येत नाही; मात्र संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आर्थिक आधार उभा राहावा, यासाठी संस्थानने राबविलेली ही विमा योजना निश्चितच दिलासादायक ठरत आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे संस्थानची कर्मचारी कल्याणाची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.