राहाता | प्रतिनिधी : गोरगरिबांना शासनाकडून मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावरून राहाता शहरातील नवनाथनगर परिसरात पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. आरव ट्रेडर्सच्या गोदामासमोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोत तब्बल ३ टन तांदूळ आणि १ टन गहू असा संशयित माल आढळून आला. वाहनासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल ५ लाख ९० हजार रुपये आहे.
दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राहाता शहरातील नवनाथनगर परिसरात आरव ट्रेडर्स येथे रेशनिंगचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच राहाता पोलिसांचे पथक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे पथक संयुक्तपणे कारवाईसाठी रवाना झाले. रात्री सुमारे १२.३५ वाजता आरव ट्रेडर्सच्या गोदामासमोर छापा टाकला असता एमएच-१२ एचडी-४४२४ क्रमांकाचा आयशर टेम्पो संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ५० किलो वजनाच्या ६० गोण्यांमध्ये ३ टन तांदूळ आणि ५० किलो वजनाच्या २० गोण्यांमध्ये १ टन गहू भरलेला आढळून आला. पोलिसांनी आरव ट्रेडर्सचे मालक नितीन रामदास पवार यांच्याकडे सदर मालाच्या मालकी हक्काबाबत चौकशी केली. मात्र, मालाबाबत कोणतेही कागदपत्र किंवा समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्यात आले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर पोलिसांनी सदर माल रेशनिंगचा आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी तहसीलदार व पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, उपलब्ध यंत्रणेतून सदर माल रेशनिंगचा आहे अथवा नाही, याची स्वतंत्रपणे पडताळणी करता येत नसल्याचे प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी वाहन व धान्य ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ लाखांचा टेम्पो, ९० हजारांचा धान्यसाठा
या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, अंदाजे ६६ हजार रुपयांचा ३ टन तांदूळ आणि २४ हजार रुपयांचा १ टन गहू, असा एकूण ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखणार कोण?
गोरगरिबांच्या ताटात जाणारा शिधा जर काळ्या बाजाराच्या मार्गाने वळविला जात असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातो. मात्र, जप्त केलेला धान्यसाठा प्रत्यक्षात रेशनिंगचा आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून नेमका धान्यसाठा कुठून आला, तो कुठे जाणार होता आणि त्यामागे काळाबाजाराचे जाळे आहे का, याचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.