श्रीरामपूर | प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील ममदापूर येथे पत्रकारिता, पोलीस आणि सामाजिक संघटनेच्या नावाचा गैरवापर करून धाक दाखवत कथितरित्या खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा जणांच्या एका टोळक्याने मावा बनविणाऱ्या महिलेच्या घरावर धाड टाकल्याचा आणि कारवाईचा धाक दाखवत तिच्याकडे तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिलांसह सहा जणांचे हे टोळके ममदापूर येथील एका महिलेच्या घरी पोहोचले. संबंधित व्यक्तींनी आपण पोलीस, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच पत्रकार असल्याचे सांगत महिलेवर कारवाई करण्याचा धाक दाखविल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी महिला मावा बनवत असल्याचे आढळून आल्यानंतर तिचा व्हिडिओही काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी संबंधित महिलेकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. मात्र, महिलेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर वाद वाढला. या वेळी महिलेला धक्काबुक्की तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पैसे देण्यास नकार; ग्रामस्थांचा संताप अनावर
महिलेसोबत गैरवर्तन होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. महिलेने आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर वातावरण चांगलेच तापले. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कथित पत्रकार आणि टोळक्यातील महिलांना जाब विचारत त्यांना चांगलाच दम दिल्याचे सांगण्यात येते.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित टोळक्याने श्रीरामपूर येथील एका सामाजिक चळवळीतील संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मध्यस्थीसाठी घटनास्थळी बोलावून घेतल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्या मध्यस्थीनेही ग्रामस्थांचा संताप कमी झाला नाही. ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यालाही जाब विचारल्याचे सांगण्यात येते.
फोनवरील संभाषणाने खंडणीच्या आरोपाला मिळाली हवा
दरम्यान, या प्रकरणाची माहिती दलित चळवळीतील एका वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. संबंधित नेत्याने फोनवरून श्रीरामपूर येथून आलेल्या पदाधिकाऱ्याची कानउघाडणी करत, “एक लाख रुपये कशासाठी मागितले?”, असा थेट सवाल केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि संभाषण सोशल मीडियावर फिरत असल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिकांना धाक दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न होत आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘पत्रकार’ म्हणून फिरणाऱ्यांची कागदपत्रे तपासा!
दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात पत्रकारिता, सामाजिक संघटना अथवा विविध चळवळींच्या नावाखाली काही व्यक्तींकडून अधिकारी, व्यापारी, पेट्रोल पंप चालक, उद्योजक तसेच इतर व्यावसायिकांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी ममदापूर येथील प्रकारामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
विशेषतः विविध YouTube चॅनल, न्यूज पोर्टल आणि सोशल मीडिया माध्यमांशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींची अधिकृत ओळख, संस्थेची नोंदणी, पत्रकारितेशी संबंधित कागदपत्रे आणि संबंधित माध्यमाची वैधता तपासण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमुळे समाजातील गैरप्रकार समोर येतात. मात्र, पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून एखाद्या नागरिकाला धमकावणे अथवा आर्थिक मागणी करणे हे अत्यंत गंभीर असल्याने अशा प्रकारांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची चर्चा असतानाही या प्रकरणात अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ममदापूर प्रकरणाची पोलिसांनी स्वतंत्रपणे चौकशी करून सत्य काय आहे, एक लाख रुपयांची मागणी कोणी केली, संबंधित व्यक्ती खरोखर पत्रकार किंवा अधिकारी होते का, महिलेला मारहाण झाली का आणि या संपूर्ण प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे,