
शिर्डी, प्रतिनिधि
: श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. भाविकांची सुरक्षा, त्यांची आर्थिक फसवणूक रोखणे आणि शहराची प्रतिमा जपणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी मानली जाते. याच पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीविरोधात प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत काणिफनाथ मंदिरालगत असलेल्या ‘साईदास फुल भांडार’ या दुकानावर भाविकांकडून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिर्डी नगरपरिषदेने संबंधित दुकान सात दिवसांसाठी सील केले. यापूर्वीही वारंवार सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी अखेर प्रशासनाला सीलची कारवाई करावी लागली.
मात्र या कारवाईनंतर आता नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. जर संबंधित दुकानाविरोधात भाविकांच्या आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या होत्या, तर केवळ सात दिवस दुकान सील करून कारवाई संपली का? संबंधित चालक आणि मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? अशी चर्चा नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या बैठकीत माजी खासदार सुजय विखे यांनी गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि साई भक्तांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे या प्रकरणात केवळ सीलची कारवाई करून विषय संपविण्याचा प्रयत्न झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित दुकान हे डॉक्टर मंगेश गुजराथी यांचे असून ते सुरेश खरात यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिर्डीची ओळख श्रद्धा आणि सेवाभावाची आहे. काही मोजक्या व्यक्तींच्या कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण व्यापारी वर्ग बदनाम होऊ नये, अशी भावना प्रामाणिक व्यावसायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
