शिर्डी, उप संपादक राजेंद्र गडकरी
: श्री साईबाबा मंदिर परिसरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा अवघ्या काही तासांत शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन करत शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची प्रचिती दिली आहे. या कारवाईमुळे एका कुटुंबावरील मोठे संकट टळले असून, पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर आई आपल्या दोन मुलींसह शिर्डीत आली होती. २ ऑगस्ट रोजी दुपारी श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ४ परिसरातून १२ वर्षीय गौरी तान्हाजी लहानगे ही अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. आईने परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला; मात्र मुलगी न मिळाल्याने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रार मिळताच शिर्डी पोलिसांनी वेळ न दवडता शोधमोहीम हाती घेतली. मंदिर परिसर, शहरातील विविध भाग तसेच उपलब्ध तांत्रिक साधनांचा वापर करून कसून शोध घेत अखेर अल्पावधीतच चिमुरडीचा सुखरूप शोध लावण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
भाविकांची मोठी गर्दी असलेल्या शिर्डीसारख्या संवेदनशील धार्मिक स्थळी अशा घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देत चिमुरडीचा सुखरूप शोध लावल्याबद्दल शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून आणि भाविकांकडून कौतुक व्यक्त होत आहे.