राहाता | प्रतिनिधी
नगर–मनमाड रस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेला आहे. या रस्त्यावर खड्डे, अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा जीविताचा धोका कायम असताना आता रस्त्याच्या कामापेक्षा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाच महामार्ग अधिक वेगाने धावताना दिसत आहे.
रस्त्याचे काम का रखडले, याचा जाब नागरिकांनी विचारल्यानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी रस्त्याच्या कामात ठेकेदारांकडून ‘टक्केवारी’ मागितल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून खासदार निलेश लंके यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ‘साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा, पैसे कुणी मागितले?’ असे आव्हान दिले होते. या मुद्द्यावरून विखे–लंके यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला.
‘टक्केवारी’चा आरोप झाला; मग सत्य बाहेर का आले नाही?
ठेकेदाराकडून टक्केवारी मागितल्याचा आरोप जर करण्यात आला असेल, तर हा सामान्य राजकीय आरोप मानून विषय संपवण्यापेक्षा कोणी मागितली, किती मागितली, कोणाकडे मागितली आणि त्याचा पुरावा काय? हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
कारण हा प्रश्न केवळ दोन नेत्यांमधील राजकीय वादाचा नाही. हा प्रश्न आहे जनतेच्या जीवाचा आणि कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक कामाचा.
आता थेट ‘ट्रम्प’ कारण पुढे!
या वादात आता आणखी एक धक्कादायक दावा चर्चेत आला आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्त्याच्या कामासाठी लागणारे डांबर उपलब्ध होत नसल्याचा दावा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
मग प्रश्न एवढाच—नगर–मनमाड रस्त्याला खड्डे पडण्यापासून ते काम रखडण्यापर्यंत आता प्रत्येक कारणासाठी जगाच्या राजकारणाकडेच पाहायचे का?
स्थानिक नागरिकांना ट्रम्प, टक्केवारी किंवा श्रेयवाद नको आहे. त्यांना चांगला रस्ता हवा आहे!
आणि या सगळ्यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे कुठे आहेत?
नगर–मनमाड रस्त्याचा मोठा भाग शिर्डी लोकसभा मतदारसंघाशी संबंधित आहे. त्यामुळे या रस्त्याच्या प्रश्नावर शिर्डीचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भूमिका काय, हा प्रश्नही आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
रस्ता खराब असताना नागरिकांचे हाल दिसत नाहीत का? अपघात होत असताना आवाज उठविणे आवश्यक वाटत नाही का?
रस्त्याच्या प्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप करणारे अनेक नेते पुढे येत आहेत; मात्र शिर्डी मतदारसंघाचे खासदार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्र सरकार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांकडे नेमका किती पाठपुरावा केला? कामाची सद्यस्थिती काय आहे? रस्ता पूर्ण करण्याची निश्चित मुदत काय आहे?
याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे.
दैनिक साईदर्शनचा थेट सवाल
‘टक्केवारी’ कोणी मागितली?—सांगाच!
‘ट्रम्प’मुळे डांबर मिळत नाही?—मग कामासाठी पर्यायी व्यवस्था कोण करणार?
रस्ता कोण पूर्ण करणार?—याचेही उत्तर द्या!
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणे थांबले पाहिजे. या रस्त्यावर आणखी किती अपघात आणि किती बळी गेल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार?
जनतेला राजकीय स्पष्टीकरण नको; सुरक्षित आणि दर्जेदार नगर–मनमाड रस्ता हवा आहे.
आरोप सिद्ध झाले तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि आरोप चुकीचे असतील तर ते करणाऱ्यांनीही जनतेसमोर स्पष्ट खुलासा केला पाहिजे. मात्र रस्ता कधी पूर्ण होणार, याचे ठोस उत्तर आता तरी मिळालेच पाहिजे!