अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटलांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. कुणबी नोंदी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर वक्तव्य करणाऱ्या विखे पाटलांना या विषयाची माहितीच नसल्याचा गंभीर आरोप करत जरांगे पाटील यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
“आम्ही विखे पाटलांना एवढे चिडवत नव्हतो. पण त्यांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त कारखाना कळतो. कारखान्यातून साखर बारीक निघाली का, जाड निघाली का, गूळ निघाला का, ढेकळ निघाले का एवढंच कळतं,” असा थेट आणि जहरी टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
‘०.०३ टक्के नोंदी’ म्हणणाऱ्यांना जरांगेंचा सवाल
विखे पाटलांनी कुणबी नोंदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरही जरांगे पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. “०.०३ टक्के नोंदी झाल्या असे सांगणाऱ्यांना नेमकी माहिती काय आहे? कधी ३०८ नोंदींची चर्चा, तर कधी १६ हजार नोंदींची चर्चा केली जाते. नेमके सत्य काय आहे?” असा थेट सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाच्या लाखो कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित विषयावर अपुरी माहिती घेऊन वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मराठा समाजाचा प्रश्न हा राजकीय खेळ करण्याचा विषय नाही. समाजाच्या लेकरा-बाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
“मराठ्यांचा देव होण्याचा प्रयत्न करू नका!”
मराठा समाजासाठी निर्णय घेतल्याचे श्रेय घेणाऱ्या नेत्यांवरही जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडले. “निर्णय घेतले हे आम्ही कधी नाकारले नाही. पण एका बाजूला निर्णय घेतल्याचे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या प्रश्नाचे वाटोळे होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, हे चालणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
विखे पाटलांसह सरकारमधील नेत्यांनी मराठा समाजाला गोड बोलून थांबवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. “आता आश्वासनांचा काळ संपला आहे. मराठा समाजाला हक्काचा निर्णय हवा आहे,” असे ते म्हणाले.
विखे पाटलांना थेट आव्हान
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ आकडेवारी सांगून समाजाची दिशाभूल करू नये, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटलांना थेट आव्हान दिले. कुणबी नोंदी, प्रमाणपत्रे आणि आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
“मराठा समाजाच्या लेकरा-बाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांना या विषयाची माहिती नाही, त्यांनी उगाच वक्तव्ये करून समाजाला गोंधळात टाकू नये,” असा घणाघाती इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटलांवर केलेल्या या थेट आणि आक्रमक टीकेमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. आता जरांगेंच्या या ‘साखर कारखाना’ टीकेला विखे पाटील काय उत्तर देणार? याकडे मराठा समाजासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.