शिर्डी ( प्रतिनिधी) रस्त्याने पायी जात असणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा मोबाईल काढून त्याला लुटण्यात आले व नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली. यासंदर्भात ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.
या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेश सखाहरी चत्तर (वय ४२, हांडेवाडी, चासनळी, कोपरगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश चत्तर हे ८ जूनपासून बेपत्ता झाले होते. राहता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.
याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना १३ जूनला दिला. बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला.
त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला.दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला. त्यानंतर या खुनाला खरी वाचा फुटली.गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले व त्यांना उसाच्या कांडक्याने व हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला.
मृतदेह उसाच्या शेतात मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला, पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांनी सांगितले. पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शिर्डी व परिसरात व्हाइटनर तसेच गांजा ,चरस ,अफू ,दारू आदी नशा करणारे तरुण मोठ्या प्रमाणात असून त्यात अल्पवयीन मुलांची संख्या वाढली आहे. नशेसाठी हे अल्पवयीन तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी अवैध व्यवसाय बंद होणे गरजेचे आहे. असे सर्वसामान्य नागरिकां कडून बोलले जात आहे.