
शिर्डी (प्रतिनिधी)- साईसंस्थानच्या तदर्थ समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. व्हीआयपी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी ब्रेक दर्शन व्यवस्था रविवार दुपारपासून सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दर्शन रांगेतील व्यत्यय टळणार असून, सामान्य भक्तांची दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
गेल्या काही काळापासून, महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती. यामुळे सामान्य दर्शन रांगेतील भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आणित्यामुळे दर्शनाला वेळ लागत होता. याशिवाय, सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांवरही अतिरिक्त ताण येत होता.
या पार्श्वभूमीवर संस्थानच्या तदर्थ समितीने हा धोरणात्मक निर्णय घेतला. नवी ब्रेक दर्शन व्यवस्थाः नव्या नियमांनुसार, शिफारस घेऊन येणाऱ्या मान्यवरांना आता केवळ निश्चित वेळेतच साई दर्शन घेता येणार आहे. यासाठी दिवसातून तीन वेळा वेळ निश्चित करण्यात आली आहे.
सकाळी ९ ते १० (एक तास), दुपारी २:३० ते ३:३० (एक तास), रात्री ८ ते ८:३० (अर्धा तास) या वेळेत समाधी मंदिरातील एका बाजूने ब्रेक दर्शनाची सोय केली जाईल, जेणेकरून सामान्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि मोठ्या देणगीदारांना वेळेचे बंधन नसेल, त्यांची दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असेल.
राजकीय आणि न्यायिक पदाधिकारी भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, विधानसभा,
विधानपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, आमदार, खासदार, आणि विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश, उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ, तसेच संस्थेच्या व्यवस्थापन तदर्थ समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त यांना ब्रेक दर्शनमधून सूट देण्यात आली आहे.