
शिर्डी (प्रतिनिधी ) राज्यामध्ये अनेक बोगस शेअर ट्रेडिंग कंपन्याकडून नागरिकांना मोठे आमिषे दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालून फसविले जात असल्याचे अनेक ठिकाणी उघड झाले असून अशा काही कंपनी चालक ,मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.शिर्डीतही ग्रो मोर ट्रेडिंग नावाने कंपनी असून या कंपनीचे चालक यांनीही मोठे आमिषे दाखवून करोडो रुपये गोळा केले आहेत.
मोठा परतावा मिळेल या आशेवर अनेकांनी या कंपनीत मोठी रक्कम गुंतवणूक केलेली आहे. मात्र आता परतावा मिळण्याचे बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांची चर्चा सुरू आहे. या चर्चे संदर्भात प्रथम दैनिक साईदर्शन मध्ये वृत्तप्रसारित होताच या कंपनीच्या चालकाने आपल्या गुंतवणूकदारांना व्हिडिओद्वारे भावनात्मक आवाहान करत आपण पंधरा दिवसात शिर्डीत प्रत्यक्ष येऊ व भेटू असे म्हटले होते. मात्र त्यास दीड महिना होऊनही या ट्रेडिंग कंपनीच्या चालकाचा शिर्डीत तपास नाही.
अनेक गुंतवणूकदार प्रत्यक्ष भेटण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी धडपडतात मात्र त्यांचा संपर्क या कंपनीच्या चालकाशी होत नसल्याचे गुंतवणूकदार खाजगीत बोलत आहेत. या ट्रेडिंग कंपनीचा चालक हा मात्र आता महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये राहत असल्याची व शिर्डीत असणारा त्याचा दीड-दोन कोटीचा बंगला, महागडी कार विकल्याची चर्चा आहे. या ट्रेडिंग कंपनीच्या चालकाने जून मध्ये गुंतवणूकदारांना पैसे मिळतील. आपण माझ्यावर विश्वास ठेवावा.
असे भावनात्मक मेसेज दिल्याचेही समजते. मात्र हा ट्रेडिंग कंपनीचा चालक गुंतवणूकदारांशी त्यानंतर प्रत्यक्ष भेटण्यास किंवा चर्चा करण्यास उपलब्ध होत नसल्याचेही गुंतवणूकदार बोलत आहेत. त्यामुळे हा फक्त वेळ काढून पणा आहे की काय? अशी शंका गुंतवणूकदारांना येत असून जर शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसा मिळत होता तर मग कार आणि बंगला विकण्याची गरज काय? असा सवाल आता गुंतवणूकदार आपआपसात करत आहेत.
हल्लीच्या काळातच राज्यात शेवगाव ,कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी बोगस शेअर ट्रेडिंग कंपन्यांच्या चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या बोगस कंपन्यांकडून मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला जाईल यावर करोडो रुपये जमा केले व नंतर पोबारा केला होता. असाच प्रकार शिर्डीत होऊ नये .
याची गुंतवणूकदारांना काळजी वाटत आहे. अनेकांनी सोन्या-चांदीचे दागिने विकून, शेती विकून ,सोसायटीचे कर्ज काढून या शिर्डीतील ट्रेडिंग कंपनीत जादा पैसे मिळतील म्हणून गुंतवणूक केली. मात्र आता परतावा मिळणे बंद झाल्यामुळे मोठे अडचणीत हे गुंतवणूकदार आले आहेत.
वेळेत आमचे पैसे मिळावे म्हणून गुंतवणूकदार आटापिटा करीत आहेत. मात्र या शेअर ट्रेडिंग कंपनीचा चालक वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित आहे. राज्यात अनेक शेअर ट्रेडिंग कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शिर्डीतील या शेअर ट्रेडिंग कंपनीची चौकशी करावी. ही शेअर ट्रेडिंग कंपनी अधिकृत आहे की अनधिकृत आहे.
पैसे कमवताना ते शासकीय कर भरतात का? या कंपन्यांचा आर्थिक उद्देश काय आहे? याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे.दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे . व सर्व गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परताव्यासह मिळाली पाहिजे.अशी भावना गुंतवणूकदारांकडून खाजगीत बोलून दाखवली जात आहे.