साईनगरी शिर्डी आर्थिक बाजारपेठ उध्वस्त होण्यासाठी कोणाचे षडयंत्र? झारीतील शुक्राचार्य कोण?
साईंच्या शिर्डी नगरीला कुबेराची नगरी म्हणून ओळखलं जातं होत. सन २००४ पर्यंत सगळ काही सुरळीत होत, प्रत्त्येक तरुणाला, महिलांना छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी जागा होती आणि स्वातंत्र्य होतं, मात्र कुणाची तरी वक्रदृष्टी पडली आणि ह्याच नगरीत गोर गरीब दुकानदारांवर पहिला आघात २००४ साली झाला, पिंपळवाडी रोड मार्केट, मारुती मार्केट मधील शेकडो दुकांनावरून नांगर फिरला, अनेक व्यवसायिक उद्ध्वस्त झाले, अनेक तरुण बेरोजगार झाले.
अशातच आपली रोजी रोटी वाचावी म्हणून केलेल्या संघर्षाला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले आणि त्यामध्ये शेकडो जणांवर दंगलीचे गुन्हे देखील दाखल झाले होते, अनेकांना मारहाण झाली होती, जेलमध्ये टाकले होते तर दुर्दैवाने पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. त्यात काही तरुणाच्या जखमा आजही त्या घटनेचे साक्षीदार असल्याची जाणीव करून देतात. हा आघात सहन करत असताना पुन्हा त्रिकोण फुल मार्केट अर्थात १०१ दुकानांवर वक्रदृष्टी पडली, या मार्केटमधील दुकानदार संघटित असल्याने त्यांनी न्यायालयीन लढा उभारला होता, अनेक वर्ष हा लढा सुरु होता परंतु राजकीय हेवेदावे, संकोचीत वृत्ती असणारे झारीतील शुक्राचार्य पुन्हा यशस्वी झाले आणि होत्याच नव्हतं झालं! अर्थात त्रिकोण मार्केट वरूनही जेसीपी फिरला आणि एका दिवसात अनेकजण बेरोजगार झाले, हे होत असताना ज्यांनी कट कारस्थान केले तेच लोक आता एकत्र आले आणि जे झालं ते वाईट झालं असं म्हणून आपल्या मनातील आनंदाला दुःखाची खोटी झालर पांघरून विस्थापितांना खोटा आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.
असो कोणतेही वाईट दिवस कायम रहात नाही, परंतु दर्शनरांग इमारत झाली आणि पूर्वेकडील मार्केट, दक्षिण व उत्तर बाजूकडील मार्केट ओस पडले, हॉटेल व्यवसाय ठप्प झाला, रेस्टॉरंट बंद पडले परिणामी मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यावर तोडगा, उपाय करण्यासाठी कोणताही राजकीय नेता, पुढारी जबाबदारी घेताना दिसत नाही, दिवसेंदिवस साई संस्थान वर न्यायालयीन पकड मजबूत होत असून संस्थांनचा सर्व कारभार हा कायद्याच्या चौकटीत आला आहे. त्यामुळे तेथे ग्रामस्थांचे वर्चस्व कमी झाले असून त्यांच्यावरच बंधने आली आहे, दर्शनासाठी ओळखपत्र सक्तीचे झाले असून विना चेकिंग कोणीही मंदिरात प्रवेश करू शकत नाही. हा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने आता कोणत्याही प्रवेश द्वारावर सुरक्षा रक्षकांच्या नियमा विरोधात कुणालाही प्रवेश मिळणार नाही हे सिद्ध झालं आहे .
आता लक्ष्मीनगरला सुगीचे दिवस आले आहे, या उपनगरातील गोरगरीब जनतेला कुठेतरी रोजीरोटी मिळून दोन पैसे मिळत आहे अर्थात दर्शन रांगेची किमया आणि साईबाबांचे आशीर्वाद म्हणून लक्ष्मीनगर वासियांना सुखाचे दिवस आले आहे. मात्र येथेही झारीतील शुक्राचार्य यांची वक्रदृष्टी पडली आहे. मात्र नगरसेवक सुरेश आरणे, सचिन चौगुले, अँड. अविनाश शेजवळ, मनसेचे लक्ष्मण कोतकर यांनी लक्ष्मीनगर वासियांना मोलाची साथ देऊन लक्ष्मीनगर गिळण्याचा घाट उधळून लावला आहे. अर्थात शिर्डीतील नागरिकांना त्यांच्याच मुळावर उठेलेल्या झारीतील शुक्राचार्य कळाले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
परंतु ये पब्लिक है, औंर सब जानती है ! या उक्तीवादाप्रमाने शिर्डीतील पुढील राजकीय गणित अवलंबून असून याचा फार मोठा फटका राजकीय व्यवस्थेवर पडणार असल्याची जोरदार चर्चा शिर्डीत सुरू आहे.
अर्थात झारीतील शुक्राचार्य कोण ?