
राहाता शहरात कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजले असून गुन्हेगारांनी शहराला वेठीस धरल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. हत्या, छेडछाड, भरदिवसा चोरी, दहशत आणि आता निष्पाप १४ वर्षीय मुलाला मोटारीखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेमुळे नागरिक हादरले आहेत. मात्र एवढ्या गंभीर घटनांनंतरही पोलीस प्रशासन सुस्तच असल्याचा आरोप करत नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे.
“फिर्यादही घेत नाहीत”; राहाता पोलिसांवर संतप्त आरोप
१४ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता “घरचे लोक पाहिजेत” असे कारण देत तक्रार दाखल करून घेण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षांनी केला. “जनतेचे रक्षण करायचे की गुन्हेगारांचे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे राहात्यात गुन्हेगारांचे मनोबल प्रचंड वाढल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण; गुन्हेगार मोकाट
राहाता शहरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून संध्याकाळनंतर बाहेर पडताना नागरिकांना भीती वाटत आहे. छेडछाड, दादागिरी आणि दहशतीच्या घटनांमुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. “पोलीस ठाण्याचा गुन्हेगारांवर जरबच उरलेला नाही,” असा थेट आरोप करत नगराध्यक्षांनी निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
“आता राज्य सुरक्षा बल रस्त्यावर उतरणार”
भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या संकल्पनेतून राहाता नगर परिषदेला महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाचे स्वतंत्र सुरक्षा पथक मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डीनंतर राहाता शहरात हे विशेष पथक गस्त घालणार असून महिलांच्या सुरक्षेसह गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.
“पोलिसांनी सुधरावं, नाहीतर जनआंदोलन होईल!”
नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “राहाता शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रियता आता सहन केली जाणार नाही. जर गुन्हेगारांवर वचक बसवला नाही, तर नगर परिषद पदाधिकारी आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही आंदोलन छेडतील.”
राहात्यात आता जनतेचा संताप उफाळून आला असून, “पोलीस जागे होणार की जनता रस्त्यावर उतरणार?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

