शिर्डी( प्रतिनिधी )
शिर्डी येथे नुकतेच दुहेरी हत्याकांड घडले त्यानंतर शिर्डी मध्ये अवैध धंदे , अवैध वाहतूक यांच्यावर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून फेरीवाले, पथ विक्रेते, कमिशन एजंट यांची धरपकड होत आहे.
शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने साईभक्त देश-विदेशातून साई दर्शनासाठी येत असतात.
साईभक्त येथे आल्यानंतर साई भक्तांना रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड येथून किंवा निवासस्थानाकडे जाण्यासाठी प्रसादालयाकडे जाण्यासाठी अपे रिक्षा तसेच येथे प्रवासी वाहतूक करणारी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोच. परंतु साई भक्तांची आर्थिक लुटमारही होते.
त्याचप्रमाणे विना नंबर प्लेट वाहने रस्त्याने अनेकदा दिसून येतात. येथे धूम स्टाईल महिलांच्या गळ्यातील सोन्याची दागिने पळविण्याचे प्रकारही वाढले आहेत. विना नंबर मोटरसायकलवर धूम स्टाईल येऊन असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विना नंबर प्लेट वाहने, अवैध वाहतूक तसेच अवैध धंदे यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे शिर्डी शहरात रस्त्यांवर फुटपाथवर पथ विक्रेते, विविध वस्तू विकणारे फेरीवाले, कमिशन एजंट व संशयित फिरणारे यांचीही धरपकड सुरू केली आहे.
शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये शिर्डीतील कायदा व सुव्यवस्था या विषयीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे प्रशासनाने ही येथे अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी अशी कारवाई राहावी. अवैध धंदे अवैध वाहतूक बंदी, व फेरीवाले, कमिशन एजंट , धरपकड मोहीम काही काळ मर्यादित न राहता कायमस्वरूपी व सातत्याने रहावी.
जेणेकरून येथे अवैध धंदे, अवैध वाहतूक व कमिशन एजंट ,फेरीवाले यांचा बंदोबस्त होईल. अवैध धंदे बंद झाल्यानंतर गुन्हेगारीही कमी होईल. शांतता सुव्यवस्था अबाधित राहील असा प्रयत्न व्हावा अशी मागणी साईभक्त, ग्रामस्थांकडून होत आहे.