
शिर्डी : ग्रामीण भागातील होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था यांनी घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद मानला जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आता एमएचटी-सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत निवासी कोचिंगची संधी उपलब्ध होणार आहे.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात नामांकित आकाश इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे. इयत्ता दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, प्रशिक्षणासह सर्व शैक्षणिक सुविधांची संपूर्ण जबाबदारी संस्थान उचलणार आहे. श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे निवासी स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार असून आधुनिक सुविधा आणि अभ्यासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी आणि तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक संकटामुळे शिक्षण थांबण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी साई संस्थानचा हा उपक्रम आशेचा किरण ठरत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणासाठी पुढे आलेल्या साई संस्थानच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, “गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उचललेले हे पाऊल खऱ्या अर्थाने समाजसेवेचे उदाहरण आहे,” अशा भावना व्यक्त होत आहेत.
