
कोट्यवधींचा रस्ता… पण मधोमधच ‘डेथ ट्रॅप’! शिर्डीतील साकुरी परिसरात साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालय रोडचे नुकतेच मोठ्या थाटामाटात रुंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. शहराच्या सौंदर्यात भर पडावी, भाविकांना सोयीस्कर प्रवास मिळावा या हेतूने झालेले हे काम आज स्वतःच अपघातांना आमंत्रण देत आहे. कारण भोजनालय गेटपासून काही अंतरावर भर रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेजचा मोठा खड्डा खचून धोकादायक अवस्थेत उभा आहे.
⚠️ भाविकांच्या जीवाशी खेळ – रोजच अपघातांचा थरार दररोज हजारो साईभक्त या रस्त्याने ये-जा करतात. मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असताना हा खड्डा वाहनधारकांना दिसतही नाही. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनं या खड्ड्यात आदळून नुकसानग्रस्त होत आहेत. किरकोळ अपघात तर रोजची बाब झाली असून, एखादा मोठा जीवघेणा अपघात घडण्याची भीती आता तीव्र झाली आहे.
😡 “काम झालं की जबाबदारी संपली?” – नगरपरिषदेवर संतापाचा भडका रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच अशी अवस्था होणे म्हणजे कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये संताप उसळला असून, “कोट्यवधी खर्च करूनही टिकाव नसलेले काम का?” असा सवाल विचारला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही शिर्डी नगरपरिषद मात्र ढिम्म असल्याचा आरोप होत आहे.
📢 सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा – ‘आंदोलनाशिवाय पर्याय नाही!’ सामाजिक कार्यकर्ते समीर वीर यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून, “अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर ‘भीक मांगो आंदोलन’ करून नगरपरिषदेच्या दारात आंदोलन उभं करू,” असा थेट इशारा दिला आहे.
🔥 मुख्याधिकाऱ्यांना थेट सवाल – अपघात झाल्यावरच जाग येणार का? मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी तातडीने लक्ष घालून हा खड्डा दुरुस्त करावा, अन्यथा एखाद्या मोठ्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
👉 शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रात अशी बेफिकिरी… प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह!

