
देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे शिर्डीसारख्या मोठ्या देवस्थानात दररोज हजारो भाविक प्रसाद ग्रहण करतात. तेथेही गॅस टंचाईचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात दररोज सुमारे चाळीस हजार भाविक प्रसाद ग्रहण करतात. त्यासाठी दररोज सुमारे दीड टन एलपीजी गॅसचा वापर होतो.
शिर्डीतील साईबाबा संस्थानमार्फत मोठे प्रसादालय चालविले जाते. येथे दररोज साधारण 35 ते 40 हजार भाविकांसाठी भोजन तयार केले जाते. याशिवाय साईभक्तांना दररोज सुमारे सात हजार नाष्ट्याची पाकिटे दिली जातात. तसेच साईभक्तांना मोफत दिली जाणारी बुंदी पाकिटे आणि प्रसाद म्हणून विक्रीसाठी तयार करण्यात येणारे लाडू मोठ्या प्रमाणावर बनविले जातात. या सर्व प्रक्रियेसाठी एलपीजी गॅसचाच मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. साई संस्थान दररोज वापरत असलेल्या गॅसपैकी जवळपास निम्मा गॅस हा केवळ लाडू आणि बुंदी तयार करण्यासाठी खर्च होतो.
त्यामुळे गॅस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास सर्वप्रथम या प्रसादाच्या निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.साईबाबा संस्थाननं 2009 साली प्रसादालयातील अन्न शिजवण्यासाठी सौर उर्जा यंत्रणा बसविली आहे. या सौर उर्जा यंत्रणेमुळे दररोज सुमारे 200 किलो एलपीजी गॅसची बचत होते. या व्यवस्थेद्वारे दररोज जवळपास पाच टन भात आणि डाळ शिजवली जाते. काही दिवसांपासून या यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, इंधन टंचाईची शक्यता लक्षात घेता हे काम थांबवून पुन्हा सौर उर्जा यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला आहे. साई संस्थानला दररोज सुमारे दीड टन गॅस लागतो. त्यामुळे संस्थाननं गॅस साठवण्यासाठी 10 टन क्षमतेचे 2 स्टोअरेज टँक उभारले आहेत.
या टँकमध्ये एकूण 20 हजार किलो गॅस साठवता येतो. हा साठा साधारणपणे 15 दिवस पुरतो. युद्ध सुरू झाल्याच्या काळात साई संस्थानकडं सुमारे 12 टन गॅससाठा शिल्लक होता. संभाव्य टंचाई लक्षात घेता संस्थाननं तातडीनं 15 टन क्षमतेचा एक गॅस टँकर मागविला. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला गॅससाठा पुढील 15 दिवस पुरेल असे सांगण्यात येत आहे.50 हजार लोक रोज प्रसादालयात भोजन करतात.
साई प्रसादालयासाठी 2 टन गॅसची गरज असते. युद्धामुळे गॅसची कमतरता पडते. सध्या, 15 दिवसापर्यंत अडचण येते. सौर उर्जेपासून भात आणि डाळ बनविली जाते. त्यामुळे दररोज 200 किलो एलपीजीची बचत होते. युद्धामुळे अशीच परिस्थिती राहिली तर चपाती, डाळ यामध्ये बदल करून जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद देण्याचा प्रयत्न करणार आहोत-अतुल वाघ, प्रशासकीय अधिकारी साईबाबा संस्थान , शिर्डी
एलपीजी टँकरचा पुरवठा सुरू ठेवण्याची हमी-सध्या, शिर्डीत भाविकांची गर्दी तुलनेनं कमी आहे. मात्र, 15 दिवसांनंतर श्रीरामनवमी उत्सव असल्याने मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काळासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गॅस पुरवठादार कंपन्यांकडून पुढेही एलपीजी टँकरचा पुरवठा सुरू ठेवण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र, अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यास श्रीरामनवमीच्या गर्दीत साई संस्थानाला प्रसादासाठी तयार होणारे लाडू आणि बुंदी निर्मिती बंद करावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


