
शिर्डी ( प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील भांबारे मळ्यातील साठवण तलाव निळवंडेच्या पाण्याने नुकताच भरला असून या तलावात 21 मे बुधवारी रोजी दुपारी 2 सख्ख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मल्हारवाडी शिवारात राहत असलेल्या प्रशांत डोशी यांची मुले साहिल प्रशांत डोशी (वय 12, इयत्ता 6 वी) आणि दिव्या प्रशांत डोशी ( वय 15, इयत्ता 10 वी) ही निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या साठवण तलावात पाणी पाहण्यासाठी गेले असता साहीलचा पाय घसरुन तो पाण्यात पडला.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने बहीण दिव्या हिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावात पाण्याची खोली जास्त असल्याने दिव्याही पाण्यात बुडाली. दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्थानिक युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मुलांचे वडील प्रशांत डोशी यांना दिली.
तोपर्यंत स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारुन साहील व दिव्याचा शोध सुरु केला होता. स्थानिक युवकांनी या दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तात्काळ राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दोन दिवसापूर्वी या परिसरात तलावात निळवंडे कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. परंतु या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेला या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. व दुःख व्यक्त होत आहे.
सध्या ग्रामीण भागात शाळांना सुट्टी आहेत. अनेक लहान मुले मामांच्या गावाला गेली आहेत. तसेच काही घरी आहेत. अनेक ठिकाणी शेततळे तलाव ओढे नाले आहेत. विहीरी आहेत. मुले सुट्टीमुळे खेळतात. बागडतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेततळे तलाव ओढे नाले आदी ठिकाणी मुलांना खेळण्यास प्रतिबंध करावा .पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे. धोक्याच्या ठिकाणी मुलांना मज्जाव करावा. असे आता नागरिकांकडून बोलले जात आहे.